टवाळखोर समाजासाठी घातक : लहान मुलेही खेळण्यासाठी बाहेर
पिंपरी – नागरिकांनी घरातच रहावे, यासाठी गेल्या काही दिवसांपासून सातत्याने पोलीस आणि प्रशासन प्रयत्न करत आहेत. शहर आणि उपनगरांमधील मुख्य रस्त्यांवर शुकशुकाट दिसून येत आहे. पिंपरी-चिंचवडमधील मुख्य रस्त्यांवर पोलिसांनी नाकाबंदी केली आहे. मात्र अनेक गल्ली-बोळांमध्ये तसेच झोपडपट्टी भागात संचारबंदी आदेशाचे बारा वाजल्याचे चित्र पहायला मिळत आहे.
गेल्या दहा दिवसांपासून पिंपरी चिंचवड शहरात एकही करोनाचा नवीन रुग्ण आढळून आलेला नाही. यामुळे महापालिकेने केलेली उपाययोजना उपयोगी ठरत असल्याचे दिसून येत आहे. परंतु अजूनही नागरिकांकडून पुरेसे सहकार्य मिळत नसल्याचे दिसून येत आहे. पूर्वी मुख्य रस्त्यांवर आणि चौका-चौकांमध्ये घोळके करुन बसणारे टवाळखोर आता अंतर्गत रस्त्यांवर आणि गल्लीबोळांमध्ये सावली पाहून बसत आहेत.
पोलिसांनी शहरात येणाऱ्या 12 रस्त्यांवर तसेच आतील विविध भागातील मुख्य रस्त्यांवर जवळपास 80 ठिकाणी नाकाबंदी केली आहे. दुकाने उघडी ठेवण्याऱ्या 345 जणांवर तसेच संचारबंदी आदेशाचा भंग केल्याप्रकरणी 321 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मात्र तरीही शहरात संचारबंदी आदेशाचे बारा वाजल्याचे दिसून येत आहे.
शहरातील बहुतांशी झोपडपट्टयांमध्ये नागरिकांचा सर्रास वावर असल्याचे दिसून येत आहे. महिला घराबाहेर गप्पा मारताना तर पुरूष नाक्यावर टोळक्याने उभे असल्याचे दिसून येत आहे. लहान मुले देखील मोठ्या प्रमाणात खेळताना दिसून येत आहेत. अशीच परिस्थिती शहराच्या इतर भागातही दिसून येत आहे. लहान मुलांसह मोठी माणसेही गल्लोगल्ली खेळताना दिसत आहेत.
सध्या परदेशातून आलेले आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनाच करोनाची लागण झाली आहे. देशातील इतर शहरांच्या तुलनेत पिंपरी-चिंचवड शहराची “करोना’बाबतची स्थिती समाधानकारक आहे. परंतु नागरिकांना “सोशल डिस्टंसिंग’चे नियम पाळले नाहीत, तर मात्र परिस्थिती बिकट होऊ शकते. तसेच सरकारने लॉक डाऊन केल्याचाही उपयोग होणार नाही. यामुळे पोलिसांनी आणखी थोडी कठोर पाऊले उचलण्याची गरज भासत आहे.