मुंबई – राज्याचे माननीय राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या ५ ते ७ ऑगस्ट दरम्यानच्या नियोजित दौऱ्याबाबत तीव्र प्रतिक्रिया अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे. राज्यपाल आपल्या दौऱ्यादरम्यान नांदेड येथील विद्यापीठात राज्याच्या अल्पसंख्याक विभागाने बांधलेल्या दोन वसतिगृहांचे उद्घाटन करणार आहेत. तसेच नांदेड, परभणी व हिंगोली इथल्या जिल्हाधिकारी कार्यालयांना भेट देऊन तिथे आढावा बैठका ते घेणार आहेत. या दौऱ्याच्या कार्यक्रमावरून राज्यपालांना आपण राज्यपाल आहोत याचा विसर पडला आहे का? असा प्रश्न उपस्थित करून राज्यपाल एकाच राज्यात दोन पॉवर सेंटर तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत, अशी टीका नवाब मलिक यांनी केली आहे.
या दौऱ्याची चर्चा आज राज्य मंत्रिमंडळ बैठकीत करण्यात आली आहे. राज्यात महाराष्ट्र विकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून राज्याचे माननीय राज्यपाल नेहमीच सरकारच्या कामात हस्तक्षेप करताना दिसून आले आहेत. यावर राज्य सरकारने तीव्र नाराजी व्यक्त केल्याचे मलिक यांनी सांगितले. बैठकीत झालेल्या चर्चेनंतर राज्याचे मुख्य सचिव स्वत: राजभवनात जाऊन राज्यपालांच्या सचिवांना चर्चेतील मुद्द्यांची माहिती देणार असल्याचे ते म्हणाले.
याआधीही कोरोना काळात राज्यपालांनी स्वतंत्र आढावा बैठक घेतल्या आहेत. आता पुन्हा हा प्रकार होत आहे. याबाबत राज्य सरकारने पूर्णपणे नाराजी व्यक्त केली आहे.
राज्यपालांनी कुलगुरु या नात्याने विद्यापीठाचा दौरा आखण्यात काहीच हरकत नाही पण राज्य सरकारच्या अधिकारांचे सातत्याने हनन करणे योग्य नाही. राज्यपालांकडून यात सुधारणा होईल, अशी अपेक्षा नवाब मलिक यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली.