हाथरस – उत्तर प्रदेशमधील हाथरस येथे सामूहिक बलात्कार झालेल्या दलित मुलीच्या मृतदेहावर मंगळवारी रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले.
पोलिसांनी दबाव आणून मध्यरात्रीच अंत्यसंस्कार उरकायला लावल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केल्यामुळे या प्रकरणाने गंभीर वळण घेतले आहे.
पोलिसांनी हे आरोप फेटाळले असून तिच्या कुटुंबीयांच्या इच्छेनुसारच हा अंत्यविधी झाल्याचे पोलिसांनी सांगितल्याचे पीटीआयच्या वृत्तात म्हटले आहे. या महिलेवर हाथरसमधील एका गावात 14 सप्टेंबर रोजी चार सवर्ण तरुणांनी बलात्कार केला होता. तिची प्रकृती ढासळल्याने तिला सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथेच तिने अखेरचा श्वास घेतला.
तिच्या मृत्यूची बातमी पसरताच हाथरस आणि दिल्लीतही समाजाच्या सर्व स्तरातून निदर्शने सुरू झाली. राजकीय, क्रीडा क्षेत्रासह सीनेजगतही या मुद्द्यावर पेटून उठले. या निदर्शनाद्वारे त्या निर्भयाला न्याय देण्याची मागणी करण्यात आली.
कडेकोट बंदोबस्तात तिच्या कुटुंबीयांनी सफदरजंग रुग्णालय मंगळवारी रात्री सोडले. मृतदेह उत्तर प्रदेश पोलिसांनी ताब्यात घेतला. दिल्लीहून तिचे कुटुंबीय येण्याआधीच या निर्भयाचा मृतदेह घरी आणण्यात आला. रात्री अडीच ते तीनच्या दरम्यान तिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले, असे तिच्या वडिलांनी सांगितले.
पोलिसांनी बळजबरीने मृतदेह ताब्यात घेतला. वडिलांना घेऊन त्यांनी अंत्यसंस्कार उरकले. माझे वडील जेव्हा हाथरसला पोहोचले त्यावेळी त्यांना पोलिसांनी तातडीने अंत्यसंस्कारासाठी नेले, असे निर्भयाच्या भावाने सांगितले.
या अंत्यसंस्कारावेळी उत्तररात्रीही वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते. समाज माध्यमांत व्हायरल झालेल्या छायाचित्रांवरून पोलिसांनी दंगल प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या होत्या. हेल्मेट परिधान केली होती.
“”आम्हाला समजेना झालेय त्यांना काय हवेय… हे कोणत्या पद्धतीचे राजकारण आहे. या महिलेवर बलात्कार झालाच नाही अशा स्वरूपाची ते विधाने करत आहेत…त्यांना काय हवे आहे.. हे प्रकरण गुंडाळण्यासाठी तर हा सारा खटाटोप चालला नाही ना?, अशी संतप्त भावना डबडबलेल्या डोळ्यांनी क्रुग्ध स्वरात तिच्या एका नातेवाईकाने व्यक्त केली.