मुंबई – आज जे केंद्रात मंत्री आहेत ते आमचे साथीदार होते. आजही आहेत. निर्भयाला न्याय मिळावा यासाठी रस्त्यावर उतरले होते. पण आता मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश येथे जेव्हा अशा प्रकारच्या बलात्कार आणि हत्येच्या घटना होतात तेव्हा सगळे शांत बसतात. अशा घटनांशी सरकारचा कोणताही संबंध नसतो. पण जी पोलीस यंत्रणा, राजकीय व्यवस्था असते त्यांनी तपास करुन गुन्हेगांना फासावर पोहोचवण्याचं काम करायचं असतं. असं म्हणत उत्तर प्रदेशातील हाथरस येथील सामूहिक बलात्कार प्रकरणावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी वृत्त वाहिनीशी बोलतांना संताप व्यक्त केला आहे.
ते पुढे म्हणाले,’अशा घटना का घडतात यासंबधी वारंवार चर्चा झाली आहे. सध्या देशात अशा घटना वाढत आहेत. कायद्याची भीती संपत आहे असं वाटू लागलं आहे. निर्भयावेळी जी भूमिका घेतली आज तीच भूमिका केंद्रातील महिला नेत्यांनी घेणं गरजेचं आहे.’ असं ही त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
दरम्यान,उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्ह्यातल्या गावामध्ये दोन आठवड्यांपूर्वी सामूहिक बलात्कार झालेल्या 19 वर्षीय पीडित महिलेचाआज दिल्लीतील रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला. यानंतर मध्यरात्री पोलिसांकडून पीडितेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेमुळे देशभरात संतप्त आणि तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. या प्रकरणामुळे दिल्लीत गाजलेल्या निर्भया प्रकरणाचीच पुनरावृत्ती झाल्याची प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागली आहे.