लखनौ: बहुजन समाज पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा मायावती यांनी स्थलांतरित मजुरांच्या दुर्दशेसाठी केंद्र सरकार आणि कॉंग्रेस दोघांनाही जबाबदार धरले. दोन्ही पक्ष कामगारांच्या मुद्दय़ावर घृणास्पद राजकारण करीत असल्याची टीका मायावती यांनी केली.
मायावती म्हणाल्या, भाजपा सरकार आणि कॉंग्रेसने कामगारांकडे सातत्याने दुर्लक्ष केले आहे, त्यामुळे त्यांना रोजगारासाठी वेगवेगळ्या शहरात जावे लागले होते आणि आता लॉकडाउनमुळे ते शेकडो किलोमीटर उपाशी आणि तहानेने व्याकुळ होऊन पायी घरी जात आहेत.
मजुरांना जनावरांप्रमाणे वागणूक दिली जात आहे. आतापर्यंत ते काम जास्त करत होते मात्र त्यांना पगार कमी दिला जात होता. बसपाने नेहमीच कामगारांच्या भल्यासाठी काम केले. आम्ही त्यांना बेरोजगारी भत्ता नाही तर रोजगार देत होतो, असे मायावती यांनी म्हटले आहे.