मुंबई -पुण्यासारख्या ठिकाणी जिथे करोनाबाधितांची संख्या जास्त आहे तिथे संपूर्ण लॉकडाऊनचा विचार मुख्यमंत्र्यांनी करावा, असा सल्ला मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. राज्यातील करोना परिस्थिती संदर्भात मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. यावेळी न्यायालयाने हा सल्ला देत मुंबईचा आदर्श राज्यातील इतर महापालिकांनीही घ्यायलाच हवा, असे मतही नोंदवले आहे. दरम्यान, राज्यातील चार जिल्ह्यांमध्ये कडक लॉकडाऊन करण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये साधारण एका आठवड्यापर्यंत लॉकडाऊन असणार आहे, पण पुण्यात सर्वाधिक रुग्ण संख्या असताना तेथे लॉकडाऊन करण्यात आलेला नाही.
राज्यात सध्या लागू केलेल्या कठोर निर्बंधांमुळेच इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्राची परिस्थिती बरी आहे. त्यामुळे राज्य सरकारने काही जिल्ह्यांसाठी निर्बंध अधिक कठोर करत थेट लॉकडाऊन लावण्याचा विचार करावा. दरम्यान, रेमडेसिविरवरून न्यायालयाने सरकारला प्रश्न केला आहे. पुण्यात रेमडेसिविरचा पुरवठा अधिक का होतोय, असा प्रश्न केला आहे.
राज्यातील रेमडेसिविर इंजेक्शनच्या परिस्थितीबाबत माहिती देताना महाधिवक्त्यांनी सांगितले की, “राज्याला सध्या दिवसाला 51 हजार रेमडेसिविरची गरज आहे. मात्र, केंद्र सरकारकडून केवळ हजार कुप्या उपलब्ध होत आहेत. आम्ही केंद्र सरकारची तक्रार करत नाही, मात्र आमची परिस्थिती सांगत आहोत.”यानंतर पुण्याला इतर जिल्ह्यांच्या तुलनेत रेमडेसिविरचा पुरवठा का होतोय? नोडल अधिकाऱ्याकडे सध्या रेमडेसिविरचा पुरवठा करणाऱ्या किती कंपन्यांची यादी उपलब्ध आहे? असे सवाल हायकोर्टाने विचारले. यावर पुण्यात मुंबईपेक्षा सुरुवातीपासूनच अधिक केसेस असल्याचं उत्तर महाधिवक्त्यांनी दिली.