मुंबई : राज्यात वाढीव वीज बिलावरुन चांगलेच राजकारण तापले आहे. मनसेकडून तर राज्यव्यापी आंदोलन करण्यात आले आहे. अशातच एक धक्कादायक खुलासा कॅबिनेट मंत्री अशोक चव्हाण यांनी केला आहे. उर्जामंत्री नितीन राऊत यांनी वीजबिलात सवलत देण्याची घोषणा करताना घाई केली. त्यांनी पक्षात आणि सरकारमध्ये घोषणा करण्याआधी चर्चा करायला हवी होती. प्रक्रिया फोलो करणे आवश्यक होते. तसे झाले नाही, ही आमच्याकडून चूक झाली, अशी कबुली मंत्री अशोक चव्हाण यांनी दिली आहे.
तिन्ही वीज कंपन्याही कुणाच्या तरी ग्राहक आहेत. कोरोनाच्या काळात आलेल्या तीन महिन्यांचे वीज देयके कुणाला जास्त आले असेल तर तीन हफ्ते पाडून आणि कुणी एकत्र भरत असेल तर 2 टक्के सवलत देऊ अशा तरतुदी केल्या आहेत. याला पैसा लागतो, पैशाचे सोंग घेता येत नाही. माफीचा निर्णय राज्य सरकारचा आहे.
कोरोनामुळे झालेल्या आर्थिक नुकसानामुळे आम्हाला थोडे माघारी यावे लागले, अशी प्रतिक्रिया उर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिली. संविधान दिनानिमित्त नागपुरातील संविधान चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केल्यानंतर ऊर्जा मंत्री नितीन राऊत बोलत होते.
विरोधीपक्ष क्रूड तेलाचे भाव कोसळले तरी त्याच भावाने म्हणजे 85 रुपयाने पेट्रोल विकत आहे. आमच जीएसटीचे 28 हजार कोटी केंद्राकडे अडले आहे, त्यातकेंद्राकडून कोणतीही मदत करत नाही. महापूर, अतिवृष्टीतही केंद्राने मदत केली नाही. माफी द्या म्हणता, तिजोरी तुमच्या काळात खाली झाली. राज्यावर 4 लाख कोटींचे कर्ज भाजप सरकारने करुन ठेवलं आहे, त्याचं काय? असे प्रश्न उर्जामंत्री नितीन राऊत यांनी उपस्थित केले आहेत.