मुंबई: केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह विधानानंतर राज्यभरात शिवसैनिकांनी आक्रमक पवित्रा घेतला. ठिकठिकाणी शिवसैनिक रस्त्यावर उतरून आंदोलन करताना दिसले. यात प्रामुख्याने युवासेनेचे वरुण सरदेसाई आघाडीवर होते. मात्र मनसेने वरुण सरदेसाईंवरुन राज्य सरकारला सवाल केले आहेत. मनसेने सरदेसाईंना ‘सरकारी भाचा’ म्हणत गृह विभागाला 8 सवाल केले आहेत.
मनसेच्या अखिल चित्रे यांनी सरकारला केलेले आठ सवाल
- तिसरी लाट किंवा डेल्टा प्लसची पूर्वकल्पना असतानाही तथाकथित युवानेता वरुण सरदेसाई मेळावे घेऊन महाराष्ट्रातील तरुणांना काय संदेश देऊ इच्छितो?
-
मराठी सण-समारंभ, सामाजिक कार्यक्रमांवर, जनतेच्या महत्त्वाच्या प्रश्नांवर होणारी आंदोलनांवर बंदी ‘सरकारी भाचा’ कार्यकर्ता मेळावा कसा घेऊ शकतो?
-
सरकारी आदेशांचं उल्लंघन केलं म्हणून वरुण सरदेसाई ह्यांच्यावर गुन्हा दाखल का होऊ नये?
-
जनतेने समाज माध्यमातून आणि जाणकारांनी माध्यमांतून रोष व्यक्त करूनही जर मेळावे होणार असतील तर सरदेसाई ह्यांच्याकडून बंधपत्र का लिहून घेऊ नये?
-
जनता निर्बंध पाळत नाही म्हणून आम्ही कडक लॉकडाऊन लावणार’ आणि ‘मी जबाबदार’ असं म्हणून जनतेवर कोरोना महासाथीचं खापर फोडणारं सरकार ‘सरकारी भाच्या’वर इतकं उदार का?
-
कुणी भ्रष्ट किंवा बेशिस्त वागत असेल तर छत्रपती शिवाजी महाराज त्या व्यक्तीचा तात्काळ बंदोबस्त करत मग अगदी आपल्या नातेसंबंधांतला का असेना… मग वारंवार शिवरायांचं नाव घेणारं हे सरकार ‘बेशिस्त भाच्याचा’ बंदोबस्त कधी करणार?
-
मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत बसणारा हा ‘सरकारी भाचा’ कोरोना नियमांना किंबहुना सरकारलाच जुमानत नाही का? सरकारला नातेवाईकांमधून कुणी आवाहन देत आहे का?
*राजकीय हेव्यादाव्यांसाठीही सरकारी भाच्याकडून आंदोलनं करताना गर्दी जमवली जाते, पोलीस कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या भगिनींना अत्यंत घाणेरड्या आवेशात शिवीगाळ केली जाते. महाराष्ट्राच्या कायदा-सुव्यवस्थेला आव्हान देणाऱ्या तथाकथित युवा नेत्याला विशेष सवलत का?