अर्थव्यवस्थेच्या विविध क्षेत्रांत ग्रीन शुट्स दृष्टिपथात
नवी दिल्ली :- मार्चपासून करोनाचा अर्थव्यवस्थेवर सुरू झालेला परिणाम आता संपुष्टात आला असून विविध क्षेत्रांतील उत्पादकता वाढू लागली आहे. लवकरच पूर्ण अर्थव्यवस्था रुळावर येईल, असे अर्थमंत्रालयाने म्हटले आहे.
आर्थिक व्यवहार विभागाने स्थूल अर्थव्यवस्थेवरील अहवालात म्हटले आहे की, लॉकडाऊन अंशतः कमी केल्यानंतर मे आणि जून महिन्यामध्ये वीज उत्पादन आणि त्याचा वापर वाढवला आहे. इंधनाचा वापर वाढत आहे. यावरून वाहतूक व्यवस्था सुरळीत झाल्याचे दिसून येते. आंतरराज्य वाहतुकीला परवानगी देण्यात आलेली आहे. त्यामुळे पुरवठासाखळी पूर्ववत होऊ लागली आहे.
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने 2020 मध्ये भारताचा विकासदर उणे 4.5 टक्के राहील असे म्हटले आहे. त्याचबरोबर इतर विश्लेषण करणाऱ्या संस्थांनी विकासदर कमी होणार असल्याचे म्हटले आहे. असे असले तरी भारत या परिस्थितीतून वेगाने बाहेर पडत असल्याची आकडेवारी समोर येत असल्याचे या अहवालात म्हटले आहे.
गेल्या महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध क्षेत्रांत ग्रीन शुट्स दिसत असल्याचे सांगितले होते. भारताने योग्य वेळी लॉकडाऊन करून जास्त मनुष्यहानी होऊ दिली नाही. त्याचबरोबर विविध क्षेत्रांना काय मदत लागणार आहे याचा सर्वसमावेशक विचार करून आर्थिक पॅकेज जाहीर केले आहे. या कारणामुळे विविध क्षेत्रांतील उत्पादकता वेगाने वाढत असल्याचे दिसून येत आहे, असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे
भारतावरील परकीय गुंतवणूकदारांचा विश्वास कमी झालेला नाही. त्यामुळेच भारताकडील चलनसाठा 500 अब्ज डॉलरच्या पुढे गेला आहे. जून महिन्यातील जीएसटी संकलन 90 हजार कोटी रुपयांवर गेले आहे. रिझर्व्ह बॅंकेने व्याजदरात बरीच कपात केली आहे. त्यामुळे आगामी काळात कमी व्याजदरावरील भांडवलाचा वापर नागरिक व उद्योगांकडून होण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात आले.