नवी दिल्ली : टोकियो ऑलिम्पिकमध्ये चमकदार कामगिरी करणारे सर्व खेळाडू काल मायदेशी परतले. सर्व खेळाडूंचे नवी दिल्लीतील विमानतळावर जल्लोषात स्वागत करण्यात आले. त्यानंतर पदकविजेत्यांचा गौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता. मात्र या सोहळ्यासाठी मंचावर लावण्यात आलेले बॅनर सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. अनेकांनी या बॅनरवर पदक विजेत्यांपेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो अधिक मोठ्या आकाराचा लावल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.
ऑलिम्पिक पदक विजेता विजेंदर सिंगनेही यासंदर्भात नाराजी व्यक्त केली आहे. पदक जिंकून आलेल्या खेळाडूंचा सत्कार करण्यासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी केंद्रीय मंत्र्यांबरोबरच खेळाडूंनाही आपली मत व्यक्त केली. मात्र या कार्यक्रमासाठी मंचावर लावण्यात आलेल्या भल्या मोठ्या बॅकड्रॉपने सर्वांचेच लक्ष वेधले. मंचावरील या पोस्टरवर पदक विजेत्या खेळाडूंच्या फोटो पेक्षा पंतप्रधान मोदींचा फोटो आकाराने मोठा असल्याचे स्पष्ट दिसत आहे.
यावरुनच अनेकांनी नाराजी व्यक्त केली. ऑलिम्पिक पदक विजेता विजेंदर सिंगनेही याबद्दल ट्विट करत मोदी सरकारला टोला लगावला आहे. मंचावरील या बॅनरचा फोटो शेअर करत विजेंदरने “सर्व गोष्टी या पीआरचा भाग आहेत आणि पीआरच सर्वकाही आहे,” असा टोला लगावला आहे.
Everything is PR PR is everything 👍🏽 pic.twitter.com/zO6IQjkdkL
— Vijender Singh (@boxervijender) August 9, 2021
काँग्रेसच्या भारतीय युवा काँग्रेसचे अध्यक्ष श्रीनिवास बी. व्ही. यांनीही ट्विटरवरुन हा फोटो शेअर करत, “पदक मोदीजींनी जिंकून आणलंय का?,” असा खोचक टोला लगावला आहे.
मेडल मोदी जी जीतकर लाये है? pic.twitter.com/taUykaLCuU
— Srinivas B V (@srinivasiyc) August 9, 2021
बी. व्ही. यांनी अन्य एका ट्विटमध्ये “खुद के चेहरे से ऐसी मोहब्बत.. न पहले कभी देखी है न सुनी है..”, अशा ओळींसहीत या कार्यक्रमामधील मंचाचा फोटो शेअर केलाय ज्यात पंतप्रधान मोदींचा चेहरा फार दुरुनही ओळखू येत असून खेळाडूंचे फोटो तुलनेने लहान आकाराचे आहेत.
खुद के चेहरे से ऐसी मोहब्बत
न पहले कभी देखी है न सुनी है..आखिर Modi ji की दिक्कत क्या है? pic.twitter.com/9QeOfu8wkX
— Srinivas B V (@srinivasiyc) August 9, 2021
सोशल नेटवर्किंगवर अनेकांनी हे फोटो शेअर करत नाराजी व्यक्त केली असून खेळाडूंचे फोटो अजून मोठ्या आकाराचे आणि अधिक प्राधान्यक्रमाने ठेवायला हवे होते असं मत नोंदवलं आहे. दरम्यान, विजेंदर सिंगने मोदी सरकारवर अशाप्रकारे टीका करण्याची ही काही पहिलीच वेळ नाही.
काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी क्रीडा प्रकारातील सर्वाधिक प्रतिष्ठेच्या खेलरत्न पुरस्काराला राजीव गांधी यांच्याऐवजी महान हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांचे नाव देण्याचा निर्णय जाहीर केला होता तेव्हाही विजेंदरने मोदी सरकारवर निशाणा साधला होता. “भाई, हे फक्त नाव बदलू शकतात, काही दिवसात भारताचे नाव देखील बदलून यूएसए करतील”, असा टोला विजेंदर सिंगने ट्विटरवरुन लगावला होता.