बाळासाहेब थोरातांचा सवाल
मुंबई : लवकरच गोड बातमी मिळेल, या अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या वक्तव्याची कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी खिल्ली उडवली आहे. भाजप रोज म्हणते गोड बातमी लवकरच मिळणार. त्यांच्या गोड बातमीची आम्ही रोज वाट पाहतोय, असे सांगतानाच गोड बातमी देणाऱ्या भाजपने मॅटर्निटी होम उघडलाय का, असा सवाल करत कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी भाजपवर टीका केली.
भाजपच्या शिष्टमंडळाने राज्यपालांची भेट घेतल्यानंतर कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी गांधी भवनमध्ये पत्रकारांशी संवावद साधला. राज्यपालांच्या भेटीबाबत त्यांना विचारले असता थोरात म्हणाले, आम्हाला वाटले की भाजप राज्यपालांना भेटून सत्ता स्थापनेचा दावा करतील. वास्तविक राज्यपालांनी सर्वात मोठ्या पक्षाला सत्तास्थापनेसाठी बोलवावे लागते. भाजपने तो दावा करून समर्थपणे सामोरे गेले पाहिजे असेही ते म्हणाले.
राज्यात उद्भवलेल्या सध्याच्या राजकीय परिस्थितीला भाजपच जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यांनी मित्र पक्षांना सांभाळले नाही. दिलेला शब्द पाळत नाही. पण हा त्या दोन पक्षातील प्रश्न असला तरी यामुळे महाराष्ट्र अडचणीत आला आहे, असेही थोरात म्हणाले.