अजय माळवे
फलटण : तालुक्यातील शेतात पिके जोमदार आहेत, त्यांना देण्यासाठी विहिरीत पाणी उपलब्ध आहे. मात्र, वीज वितरण कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे योग्य दाबाने, अखंडित वीज पुरवठा होत नसल्यामुळे उपलब्ध पाणी पिकांना देता येत नाही. मात्र, त्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे.
फलटण हा प्रामुख्याने रब्बीचा तालुका समजण्यात येत असला तरी यावर्षी समाधानकारक पाऊस आणि नीरा उजवा कालव्यातून उपलब्ध झालेले मुबलक पाणी यामुळे सर्वसाधारण क्षेत्रात सुमारे तीन हजार हेक्टर तर ऊसाच्या क्षेत्रातही सुमारे तीन हजार हेक्टर क्षेत्र वाढले असून सर्व पिके जोमदार आहेत. लागणीनंतर पाणी कमी मिळाल्याने सध्या तुटणाऱ्या ऊसाचे एकरी उत्पादनात काही प्रमाणात घट झाली आहे. तालुक्यात रब्बीचे सर्वसाधारण क्षेत्र 31 हजार 647 हेक्टर असून पाऊस व पाण्याच्या उपलब्धतेमुळे 34 हजार 670 हेक्टर म्हणजे सर्वसाधारण क्षेत्रापेक्षा तीन हजार 24 हेक्टरवर रब्बीची पेरणी अधिक झाली आहे.
रब्बी क्षेत्रात वाढ झाली असताना हंगामाच्या प्रारंभी पावसाने ओढ दिली. त्यानंतर अतिवृष्टीमुळे रब्बी ज्वारीच्या पेरण्या लांबल्याने क्षेत्रात घट झाली आहे. रब्बी ज्वारीचे सर्वसाधारण क्षेत्र 21 हजार 94 हेक्टर असताना 19 हजार 994 हेक्टर क्षेत्रावर ज्वारीचा पेरा झाल्याने 10ते 15 टक्के क्षेत्र घटले आहे. रब्बी ज्वारीचे क्षेत्र घटले असले तरी मका, गहू, हरभरा क्षेत्रात वाढ झाली आहे. मक्याचे सर्वसाधारण क्षेत्र तीन हजार 15 हेक्टर असताना प्रत्यक्ष तीन हजार 517 हेक्टर क्षेत्रावर, गव्हाचे सर्वसाधारण क्षेत्र 5417 हेक्टर असताना प्रत्यक्ष 8300 हेक्टरवर, हरभरा सर्वसाधरण क्षेत्र एक हजार 936 हेक्टर असताना दोन हजार 818 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे.
रब्बी हंगामातील पिके जोमदार असून काही प्रमाणात रोगकिडीचा प्रादुर्भाव जाणवत असला तरी त्याच्या प्रतिबंधासाठी शेतकरी प्रबोधन विशेषतः हस्त पत्रिका व अन्य मार्गाने कीड नियंत्रणाविषयी घ्यावयाची दक्षता शेतकऱ्यांनी समजून घेतल्याने कीड रोग प्रादुर्भाव रोखण्यात यश आले आहे. हरभरा पिकावर घाटे आळीचा प्रादुर्भाव अल्प प्रमाणात केवळ एक टक्के आढळताच वेळेवर कीटकनाशकाची फवारणी करुन आर्थिक नुकसान टाळण्याचा यशस्वी प्रयत्न करण्यात आला, तर मका पिकावरील अमेरिकन लष्करी आळीचा प्रादुर्भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी शेतकरी योग्य नियोजन करीत आहे. गव्हावर कीड नसून ज्वारीवर मावा तुडतुड्यामुळे चिकटा रोगाचा प्रादुर्भाव जाणवत आहे. मात्र, ज्वारीवर फवारणी करण्याचा प्रघात नसल्याने ज्वारीवर अल्पप्रमाणात चिकटा असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
ऊसाचे सर्वसाधारण क्षेत्र 12 हजार हेक्टर आणि खोडवा सुमारे चार हजार हेक्टर असून आतापर्यंत चार हजार 479 हेक्टरवर आडसाली, सात हजार 949 हेक्टरवर पूर्वहंगामी ऊसाच्या लागणी झाल्या आहेत. ऊसाच्या लागणी सुरु आहेत तर दोन हजार हेक्टरवर खोडवा अपेक्षित असून यावर्षी ऊसावर कोणत्याही रोगकिडीचा प्रादुर्भाव नसून पिके चांगली आहेत. मात्र, सुरुवातीच्या काळात पाणी कमी पडल्याने सध्या तुटणाऱ्या ऊसाचे एकरी उत्पादन काही प्रमाणात घटण्याची शक्यता आहे.
कांद्याचे गगनाला भिडलेले दर विचारात घेऊन कांद्याच्या क्षेत्रात अल्प वाढ झाली आहे. मात्र, दर कमी झाल्यानंतरही कांदा लागणी सुरु आहे. टोमॅटो क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता असून 500 हेक्टर सर्वसाधारण क्षेत्रापैकी आतापर्यंत 304 हेक्टरवर टोमॅटो लागणी झाल्या असून सध्या टोमॅटो लागणी सुरु आहेत. वीज वितरण कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे शेतात पिके जोमदार असूनही विहिरीत पाणी उपलब्ध असूनही योग्य दाबाने, अखंडित वीज पुरवठ्याअभावी पिकांना पाणी देता येत नसल्याने शेतकरी हतबल आहे.