प्रहार जनशक्तीचे जेलभरो आंदोलन : पीकविम्याची रक्कम तातडीने द्या
सातारा – शेतकऱ्यांचा सात बारा कोरा झालाच पाहिजे, यासह पीकविम्याची रक्कम तातडीने देण्याच्या मागणीसाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जेलभरो आंदोलन करण्यात आले. संपर्कप्रमुख आझादसिंह उर्फ शंभुराज खलाटे यांच्या नेतृत्वाखाली प्रदीप फाळके, धनंजय पवार, विजय मोरे, सत्यजित गायकवाड, तानाजी जाधव, अमोल जाधव, सूर्यकांत मदने यांनी जेलभरो आंदोलन केले.
रोजगार हमीच्या कामांमध्ये शेतीचे पेरणी ते कापणीपर्यंतच्या कामाचा समावेश करावा, घोषित झालेल्या दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना अनुदान तातडीने द्यावे, दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्क माफ करावे, ओबीसीसाठी स्वतंत्र घरकुल योजना सुरू करून त्यासाठी शासनाने तातडीने आर्थिक तरतुद करावी, उसाची एफआरपी रक्कम 14 दिवसात कारखान्याने न दिल्यास ती रक्कम शासनाने त्वरीत द्यावी, गावनिहाय साखर उतारा समित्या स्थापन करून रिकव्हरी चोरी थांबवावी, प्रत्येक तालुका स्तरावर रिकव्हरी तपासणी सेंटर शासनाने उभे करावे, आदिवासींचे प्रलंबित वन हक्क जमीन पट्टे त्वरीत वाटप करावीत, शेतकऱ्यांना थ्री फेज वीज सकाळी 6 ते सायंकाळी 7 पर्यंतच्या 13 तासांपैकी 8 तास वीज द्यावी, स्वर्गीय गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेत शेत मजूरांचा समावेश करण्यात यावा, उस, कांदा, तुर, सोयाबीन इत्यादी पिकांना जाहीर केलेले अनुदान तातडीने मिळावे दुष्काळामुळे नुकसान झालेल्या फळबागांना मदत देण्यात यावी, दुबार पेरणीच्या संकटात असलेल्या शेतकऱ्यांना बियाणे, खतांसाठी शासनाने आर्थिक मदत द्यावी, प्रकल्पग्रस्तांना पुनर्वसन मोबदला व शासकीय नोकरी देण्यात यावी. निराधार माता-भगिनींना वार्षिक 10 हजार रूपये भाऊबीज भेट देण्यात यावी, पन्नास टक्के नफा गृहीत धरून शेतीमालाला हमी भाव द्यावा अन्यथा स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी तातडीने करा, हस्तलिखीत आणि ऑनलाईन सातबारामधील तफावत दुरूस्त करण्यात यावी, आदी मागण्यांसाठी आंदोलन करत असल्याचे खलाटे यांनी सांगितले.