योग्य वेळी योग्य भूमिका घेऊ…
नागवडे व कुकडी साखर कारखाना निवडणुकीत आपली काय भूमिका असेल, असे विचारले असता शेलार म्हणाले, सहकारी संस्थांमध्ये राजकारण करण्यासारखी परिस्थिती नाही. संस्था आणि सभासदांचे हित पाहून निर्णय घेणार. कुकडी कारखाना निवडणुकीत माजी आमदार राहुल जगताप यांच्याबरोबर उभा राहणार आहे. मात्र नागवडे कारखाना निवडणुकीत योग्य वेळी योग्य भूमिका घेऊ.
श्रीगोंदा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंचनामे झाले नसले, तरी नुकसान भरपाई मिळेल, असे सांगतात. पण शासन शेतकऱ्यांशी दुजाभाव करत तुटपुंजी रक्कम देते. त्यामुळे शासनाने सरसकट व पीक उत्पादन प्रमाणात नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष घनश्याम शेलार यांनी पत्रकारांशी बोलताना केली.
शेलार म्हणाले, विधानसभा निवडणुकीत मला कमी वेळ मिळाला. अशा परिस्थितीत मतदार व कार्यकर्त्यांनी ही निवडणूक हातात घेतली. पण धनशक्तीमुळे पराभव झाला. पडलेली मते आणि सत्तेच्या विरोधातील जनादेश पाहता आपण लोकांच्या प्रश्नाबरोबर राहणार आहोत. 4 नोव्हेंबरपासून मतदारसंघाचा आभार दौरा आणि शेतात जाऊन शेतकऱ्यांशी पीक नुकसानीवर संवाद साधणार आहे. यावेळी ज्येष्ठ नेते बाबासाहेब भोस, कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष दीपक भोसले, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष हरिदास शिर्के, संजय आनंदकर, राजाराम जठार, सुनीता हिरडे आदी उपस्थित होते.