चंडीगढ – शिरोमणी अकाली दलाच्या (एसएडी) नेत्या हरसिम्रत कौर बादल यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा दिल्याच्या घडामोडीवर भाजपकडून प्रथमच प्रतिक्रिया देण्यात आली आहे. हरसिम्रत यांचा राजीनामा हा राजकीय निर्णय असल्याचे त्या पक्षाने म्हटले आहे.
कृषिक्षेत्रांशी संबंधित तीन विधेयकांना विरोध दर्शवण्यासाठी हरसिम्रत यांनी गुरूवारी राजीनामा दिला. त्यामुळे भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्रातील सत्तारूढ आघाडीमध्येच (एनडीए) त्या विधेयकांवरून नाराजी असल्याचे समोर आले.
हरसिम्रत यांचा राजीनामा मोदी सरकारसाठी एक झटका मानला जात आहे. त्यापार्श्वभूमीवर, भाजपचे पंजाब प्रदेशाध्यक्ष अश्वनी शर्मा यांनी प्रतिक्रिया दिली. एसएडी आणि भाजप मित्रपक्ष असले तरी ते स्वतंत्र पक्ष आहेत. काही राजकीय कारणांवरून एसएडीने निर्णय घेतला. तसे असले तरी तो पक्ष एनडीएचाच घटक आहे, असे त्यांनी म्हटले.
दरम्यान, एनडीएमध्ये रहायचे की नाही याचा निर्णय एसएडीच्या बैठकीत घेतला जाईल, असे त्या पक्षाचे अध्यक्ष सुखबिरसिंग बादल यांनी गुरूवारी म्हटले. त्यामुळे तो पक्ष काय निर्णय घेणार याविषयीची उत्सुकता बळावली आहे.