दहा लाख रुपयांपेक्षा गुंतवणूक कमी असणार
नवी दिल्ली: केंद्र सरकारकडून छोटे 70,000 अन्नप्रक्रिया उद्योग उभारण्यासाठी ग्राम समृद्धी योजना सुरू केली जाणार आहे. दहा लाख रुपयांपेक्षा कमी भांडवल असलेले हे उद्योग छोट्या शेतकऱ्यांनी चालविणे अपेक्षित असल्याचे अन्नप्रक्रिया मंत्री हरसिमरत कौर बादल यांनी सांगितले.
त्यामुळे जास्तीत जास्त रोजगार निर्मितीला चालना मिळणार आहे. या उद्योगांना भांडवल पुरवठा करण्यासाठी एक बिगर बॅंकिंग वित्तीय संस्था निर्माण केली झाली जाणार आहे. या उपक्रमाला जागतिक बॅंक सहकार्य करण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले. सुरुवातीला चार राज्यात या योजनेची अंमलबजावणी केली जाईल आणि त्यानंतर देशभरात ही योजना लागू केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
खेड्यात या उद्योगामुळे रोजगार निर्मिती होईल आणि खेड्यातील शेतकऱ्यांच्या मुलांना शहरात स्थलांतर करण्याची गरज पडणार नाही, असा या योजनेचा उद्देश आहे. पूर्व भागात या योजनेची अंमलबजावणी करण्यावर जास्त भर दिला जाणार आहे कारण या भागात हा उद्योग वाढण्याची जास्त क्षमता आहे.