राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नेत्यांनी एक मुखाने हर्षवर्धन पाटील यांना दिला पाठिंबा
रेडा: इंदापूर तालुक्यात परिवर्तन घडवण्यासाठी बाजार समितीचे सभापती अप्पासाहेब जगदाळे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी माझ्या उमेदवारीला पाठिंबा देत साथ दिली आहे. त्यामुळे उद्याच्या विजयाचे शिल्पकार अप्पासाहेब जगदाळे यांच्यासह भाजपचे सर्व कार्यकर्ते असतील असा विश्वास भारतीय जनता पार्टीचे इंदापूर विधानसभेचे उमेदवार हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केला.
इंदापूर बाजार समितीच्या प्रांगणात कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अप्पासाहेब जगदाळे यांनी आयोजन केलेल्या “आश्वासन नको शब्द हवा” या मेळाव्यात राज्याचे माजी सहकार मंत्री व भारतीय जनता पार्टीचे इंदापूर विधानसभेचे उमेदवार हर्षवर्धन पाटील बोलत होते. यावेळी छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन बाळासाहेब घोलप, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते अशोकराव घोगरे, संजय निंबाळकर, विजय निंबाळकर, काकासाहेब वाबळे, इंदापूर नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष अरविंद वाघ, भाजपचे तालुकाध्यक्ष नानासाहेब शेंडे,कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याच्या उपाध्यक्षा पद्माताई भोसले, उदयसिंह पाटील, पृथ्वीराज जाचक, कृष्णाजी यादव, प्रदीप जगदाळे, माऊली वाघमोडे, दीपक जाधव, विलासराव वाघमोडे, अमोलराजे इंगळे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
हर्षवर्धन पाटील म्हणाले, इंदापूर विधानसभेसाठी अप्पासाहेब जगदाळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. परंतु हा अर्ज दाखल करताना शेतकऱ्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी उद्देश होता. ज्या शेतकऱ्यांच्या हितासाठी शेतीच्या पाण्यासाठी तब्बल 14 मागण्या जो नेता पूर्ण करेल त्या उमेदवारास पाठिंबा देण्याचे धोरण अप्पासाहेब जगदाळे यांनी ठेवले होते.
भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडे या 14 मागण्याचे लेखी निवेदन त्यांनी मांडले त्यांना भारतीय जनता पार्टीकडून या मागण्या पूर्णत्वाकडे पोहोचतील, असे खात्रीलायक वाटल्याने आपल्या उमेदवारीला जगदाळे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते व नेत्यांनी पाठिंबा दिला आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना या मागण्या संदर्भात आम्ही मेल वरती कळवले आहे व या मागण्या पूर्ण केल्या जातील असा शब्द खुद्द मुख्यमंत्री फडणवीस यांनी आम्हाला दिला आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी चिंता करू नये असे हर्षवर्धन पाटील म्हणाले.
लाकडी निंबोडी योजना पूर्ण करण्यासाठी जवळपास अडीचशे कोटीचा निधी लागणार आहे. तर सुरू असलेल्या बोगद्यातून निरा भीमा स्थिरीकरण योजना राबवून इंदापूर तालुक्यातील तलाव पावसाळ्यामध्ये भरून घेतले जातील. तसेच नीरा व भीमा या दोन नद्यांवर स्वयंचलित दरवाजे बसवून बंधारे पूर्ण केले जाणार आहेत. नीरा डावा तसेच खडकवासला कॅनल चे खोलीकरण रुंदीकरण करण्यासाठी शासनाकडून निधी उपलब्ध केला जाईल. तालुक्यातील 22 गावांसाठी संसार कट मधून मिळणारे 3.9 टीएमसी हक्काचे पाणी खडकवासला कॅनॉलमधून शेतकऱ्यांना मिळवून देण्यासाठी मी कटिबद्ध असेल. खऱ्या अर्थाने कष्टाला पाण्याची साथ मिळण्यासाठी मेहनत घेतली जाईल अशी ग्वाही हर्षवर्धन पाटील यांनी दिली.
उजनी धरणातील पाणी दूषित होऊ नये म्हणून धोरणात्मक निर्णय घेतला जाईल तसेच पाणी वापर संस्था काढल्या जातील, असे बोलून हर्षवर्धन पाटील म्हणाले की, विरोधक रोटेशन प्रमाणे पाणी मिळाले चा गाजावाजा करतात मात्र रोटेशन हे पाच वर्षाला नसते तर ते दोन महिन्याला असते.इंदापूर तालुक्यातील युवावर्गाच्या दोन हाताला काम देण्यासाठी एमआयडीसी मध्ये भाजप सरकारच्या माध्यमातून तब्बल पंचवीस हजार कोटीची गुंतवणूक करू.
अप्पासाहेब जगदाळे म्हणाले, मला उमेदवारी दिली नाही तरीदेखील माझ्या सार्वजनिक मागण्यांचा विचार करायला हवा होता. परंतु मला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उमेदवाराने फोन देखील केला नाही. त्यामुळे मी माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तसेच विजयसिंह मोहिते पाटील यांच्याबरोबर यासंदर्भात सविस्तर चर्चा केली.