नवी दिल्ली – राजधानी दिल्लीमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाढीस लागलेली कोरोना रुग्णांची संख्या अवघ्या देशासाठी चिंतेचा विषय ठरत आहे. देशातील बहुतांश राज्यांमध्ये कोरोनाचा आलेख घसरला असतानाच दिल्लीप्रमाणे आपल्याकडेही कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढीस लागतील काय? असाच प्रश्न सर्वांसमोर उभा ठाकला आहे. असे असतानाच आज केंद्रीय आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्री हर्ष वर्धन यांनी कोरोना लसीबाबत केलेलं विधान दिलासा देणार ठरत आहे.
हर्ष वर्धन यांनी, “पुढच्या तीन ते चार महिन्यात देशात करोनावरील लस तयार होईल” असा विश्वास व्यक्त केला. फिक्की एफएलओच्या एका वेबिनारमध्ये बोलताना त्यांनी हे विधान केले.
हर्ष वर्धन यांनी याबाबत अधिक माहिती देताना, “मला पूर्ण विश्वास आहे की, पुढच्या तीन ते चार महिन्यात करोनावरील लस तयार होईल. वैज्ञानिक डाटाच्या आधारावर लोहासीकरणात कोणाला प्राधान्य द्यायचे त्याचा आराखडा ठरवण्यात येईल. आरोग्य क्षेत्रातील कर्मचारी, करोना योद्ध्यांना सहाजिकच प्राधान्य मिळेल, त्या खालोखाल वयोवृद्ध व्यक्ती आणि आजारी व्यक्तींना प्राधान्य मिळू शकते” असं देखील संगितलं.
२०२१ आपल्या सर्वांसाठी चांगले वर्ष ठरेल
लस उपलब्ध झाल्यानंतर ती पोहोचवण्याच्या योजनेवर काम सुरु आहे. यावेळी त्यांनी २०२१ आपल्या सर्वांसाठी चांगले वर्ष ठरेल, असा आशावाद व्यक्त केला. जुलै-ऑगस्ट २०२१ मध्ये २५ ते ३० कोटी लोकांसाठी करोना लसीचे ४० ते ५० कोटी डोस उपलब्ध झालेले असतील, असा अंदाजही हर्षवर्धन यांनी व्यक्त केला.