दोन तास आधी थिएटर खच्चाखच्च भरलेलं, शेजारी बायाबापडे कुटूंब नि लहानग्यांसोबत “हिरकणी’ पाहायला आलेले. बाळ म्हणतंय, बाबा शिवाजी महाराज कुठाय? म्हणजे, या बहाद्दराला “शिवाजी महाराजांच्या चित्रपटाला जायचं ना?’ हे निमित्त दिलंय तर. कुटुंबाने चित्रपट एकत्र पाहण्याचे क्षण मुळातच कमी! पण हिरकणीमुळे ते शक्य झाले. एकीकडे गड भाड्याने देऊ पाहणारे सरकार… त्यांच्यासमोर हे कलाकार इतिहास जपण्याची जबाबदारी हाती घेतात आणि त्याला प्रेक्षक केवळ मोठ्या संख्येने नाही तर हाऊसफुल प्रतिसाद देतात, हेच प्रसाद ओकची पाठ थोपटण्यासाठी पुरेसे आहे.
या कुटुंबाच्या हालचालीत नि कुजुबुजीत चित्रपट सुरू होतो, स्क्रीनवर जेव्हा अनेक कलाकार दिसतात तेव्हा ध्यानात येते हा इतिहास समोर आणायला मनुष्यबळही मोठ्या प्रमाणात लागले. पण या मावळ्यांचं काम करताना त्यांच्या आयुष्यात शिवबाच्या इतिहासाचा अंश पेरला गेला. चित्रपटात पहिल्याच दृश्यात महाराजांच्या राज्याभिषेकाचा दिवशी शेतकरी, स्त्रिया, मुस्लिम, धनगर, माळी, वारकरी या स्वराज्यातील घटकांचा उत्साह जिव्हाळ्याने उलगडला आहे, त्यातील “हर बशर का ख्वाब हैं तू’ हा कव्वालीचा भाग मला खूप भावला.
ही कथा महाराजांचा रायगडवाडीत रहाणारा मावळा जीवजीच्या पत्नीची हिरकणीची. पडद्यावर दिसतेय ती सोनाली कुलकर्णी. ही विनामेकअपही नेहमीपेक्षा खूपच जास्त आवडतेय. तिच्या सौंदर्यापेक्षा तिची भूमिकासमोर येते. कर्तृत्व नि हिरकणी त्यात अधोरेखित होत जाते. परंतु अमित खेडेकरची नटाच्या भूमिकेतील एंट्री ही शॉकिंग होती.
जेव्हा एक बाई जन्म घेते, तिची ताई होते, स्त्री होते, पत्नी होते नि जेव्हा ती आई होते तेव्हा तिच्यासाठी या जगात तिच्याहून गडगंज श्रीमंत कुणी नसतेच नि या श्रीमंतीत तिच्या बाळापेक्षा मोठा राजा उरतच नाही कुणी.
लहानपणी बालभारतीच्या पुस्तकात वाचलेली हिरकणी कविता मनात बॅकग्राऊंडला आणि समोर त्याचे चलचित्र. प्रत्येक फ्रेममध्ये दिवसा प्रकाशाचा कवडसा आणि रात्री पणत्यांची रोषणाई. लाईटीच्या प्रकाशाचा तिळमात्र संबंध यात तिरीप टाकत नाही.
कथेत प्रहर बदलला की तोफेचा धडकी भरवणारा आवाज हळूहळू आपल्या मनातही त्या काळातील संरक्षण करण्यासाठी आखलेल्या कल्पनांना दाद देण्यास भाग पडतो. एका आदर्श स्वराज्यात राहणाऱ्या मावळ्याची बायको हिरकणीने तिच्या तान्ह्या बाळाच्या एकट्या राहण्याच्या कल्पनेने सर केलेला पश्चिम कडा, ही एका वाक्यात पूर्ण संपूर्ण कथा पण त्याला एक तास 38 मिनिटे. जेवढं आहे तेवढंच नेमकं साकारण्याची कला वाखाणण्यासारखी आहे. चूल आणि मूल म्हणजे स्त्री ही कमीपणाची उक्ती हिरकणीने तिच्या कर्तृत्वातून धुडकावून लावली. हे सगळं होताना शेजारी बसलेलं छोटं बाळही मोठ्या कौतुकाने चलचित्र न्याहाळतेय.
जिवजी आणि हिराची प्रेमकथा दाखवल्यानंतर मात्र एक दिवस जीवजीला जंजिराच्या लढाईसाठी मोहिमेवर जावे लागते नि इकडे गायी-म्हशींचे दूध विकून उदरनिर्वाह करणाऱ्या हिराला गडावर दूध टाकायला जायचे असते. घरी एकट्या बाळाकडे पाहायला शेजारची आजी असली तरी हाताएवढं भरणारं ते इवलुसे बाळ डोळ्याआड होणं, हे हिराच्या हुरहुरीतून नेमकेपणाने समोर येते, तेव्हा जाणवते युद्धावर गेलेल्या आपल्या पुरुषाची वाट पाहणाऱ्या बायकोची नि बाळाची काय हाल होत असेल रात्रीला? मायेची पावलं घरातच बांधलेली असतात, पण ती बाहेर पडली की ती काळजाचा तुकडा घरात बांधून ठेवतात.
मध्यान्हाला गडावर तोफ दणाणून सूर्यास्त होऊन दरवाजे बंद झाले. प्रेक्षागृहात चुळबुळ सुरु होते, पण डोकं इतिहासाच्या माहोलमध्ये गुंतून जाते. लहानपणी इतिहासातील रायगडावरील गवळण हिरकणी आणि तिचा बुरुज लक्षात आहे पण चित्रपट अडकून ठेवतो.
पश्चिमेचा परिचय करत गडावरचा सांडणारा कडा आणि दीड गाव खोल दरी, केवळ वारा आणि पाणी खाली जाऊ शकते अशा ठिकाणी माणूस वाऱ्यालाही उभा राहणे अशक्य असते सांगत चित्रपट पुन्हा सुरु होतो. गडावर दूध घालायला गेलेल्या हिराला त्या दिवशी दूध विकून येण्यास उशीर होतो. सूर्यास्तानंतर बंद झाले की, ते पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळीच उघडत असत. ही महाराजांची आज्ञा तिला ठाऊक असते. तरीही घरी तान्हं बाळ असल्यामुळे ती गडकऱ्यांना फार विनंती करते, पण दरवाजे उघडत नाही. आईवाचून ते तान्हे रात्रभर कसे राहील, ह्या विचाराने आईची चिंता वाढतेच. ह्या विचारातच हिरा किल्ल्याच्या कड्यावरून खाली उतरण्याचा निर्णय घेते. गडाखाली बाळाची हाक हिराला रस्ता दाखवते. गडाचे दरवाजे जरी बंद होतात पण आईसाठी दगडाने पेटवलेली आगही रस्ता बनते, हे हिराच्या धडपडीतून दिसते.
रायगडाचे दरवाजे बंद झाले की, खालून वर येईल ती फक्त हवा आणि वरून खाली जाईल ते फक्त पाणी. पण ह्या गोष्टीला अपवाद ठरणारं कर्तृत्व म्हणजे हिरकणी हिरा तो पश्चिम कडा उतरायला सुरुवात करते. वरतून जेव्हा खालचा व्ह्यू दाखवला जातो, तेव्हा गडाच्या खाचखळग्यांचा अंदाज येतो खरा, पण त्या गडावर केलेला फोकस आणि हळूहळू कॅमेरा मागे नेत गडाच्या लांबी रूंदीसह त्याची कठोरता आणि अशक्यपणा अधोरेखित होतो, पण एका आईसाठी ते आव्हान पार करणं एवढं पक्क असतं, तिथून एकदा कडा उतरायला सुरुवात केली तर मागे जाण्यासाठी न रस्ता न पुढे जाण्यासाठी जगण्याची आशा. पण जसं अर्जुनाला फक्त पक्षाचा डोळा दिसतो तसं त्या आईला तिचं मूल दिसत राहते.
वरती चंद्र दिमतीला आणि खाली रात्रीच्या घनघोर अंधारात रणसंग्रामात आईचं स्वतःच्या मुलावर असलेल्या प्रेमासाठी द्वंद्व चालावं, ज्यात जिंकणं नाहीतर मरणं, एवढंच उरणार, तसा तिचा संघर्ष सुरू होतो, हळूहळू हिरा कडा उतरू लागते, अर्ध्या रस्त्यात ती गेली खरं पण जर तिथून परतावं वाटलं असतं तर? मागे वळण्यासाठी पुन्हा पार केलेल्या दगडांच्या रांगा, एखादा निसरडा दगड नि हिरा म्हणून जन्मलेली माता अदृश्य ! कारण रात्र वैऱ्याची असते म्हणतात. तशी ही कोजागिरी दुधाची पांढरी रात्र तिच्यासाठी काळरात्र ठरत होती. एकीकडे गडावर साजरा होणारा कोजागिरीचा उत्सव तर दुसरीकडे एक एक दगड जपून पाऊलं टाकत चप्पाचप्पा सर करणारी ही आई! काय सादर केलय. पोटात गोळा अन् श्वासांची चालढकल.
हिरा दगडाला खाली टाकून पाहत नि त्या अंदाजाने हळूहळू पाऊले टाकत जाते, भीतीचा धोका… आवंढा… साप, मधमशा, विंचू काटे नि अजुन काय पाहताना जीव पुरता मुठीत आलेला असतो, हा अनुभव अनुभवण्याचा आहे!
ती जेव्हा विश्रांतीसाठी कड्यावर थांबते तेव्हा पापी मनात शंका येते, कडा उतरायलाही पहाट लागणार होती तर मग सकाळपर्यंत थांबली असती? शेजारच्या आजीने बाळाला एकटं तर टाकलं नसेल मग तरीही ? पण जवळच बसलेल्या माझ्या आईच्या नजरेत कळतं स्त्रीत्वाला आईचं काळीज घडवतं तेव्हा हृदयात केवळ त्याचं पान्हा फुटून रडणं ऐकू येतं. कानात, मनात येणारे नकारात्मक विचार शांत बसू देत नाही, कुठलाच निष्काळजीपणा माझ्या बाळाच्या नसण्याचे कारण बनू नये, एवढीच निरागस अपेक्षा असते, तेव्हा होतात असे कडे सर. त्यामुळेच दिग्दर्शक ओक म्हणतो तसे, प्रत्येक आई असतेच हिरकणी!
हिराची ही कहाणी ऐकून त्या शूर मातेचा महाराजांनी साडी-चोळी देऊन सन्मान केलाच पण ज्या कड्यावरून ती खाली उतरली त्या कड्यावर आईच्या प्रेमाची साक्ष म्हणून हिरकणी बुरुज बांधण्यात आला. त्याचबरोबर ती राहत असलेल्या गावाला तिचे नाव देण्यात आले. ते गाव म्हणजेच रायगडाजवळील हिरकणीवाडी. सध्या रायगडावर जाण्या-येण्यासाठी बनवण्यात आलेला रोपवे हा त्याच हिरकणीवाडीतून उपलब्ध करून देण्यात आला आहे.
-पूजा ढेरिंगे