अपार जिद्द, प्रामाणिक कष्टाची तयारी, सहनशक्ती, चिकाटी, प्रचंड आत्मविश्वास, आशावाद, उत्साह, समाजाविषयी आस या सर्व गुणांनी संपन्न असे व्यक्तिमत्त्व म्हणजे “घनोबा डेव्हलपर्स’चे चेअरमन हरिषशेठ येवले-पाटील. या गुणांसह मिळालेल्या वेळेचे काटेकोर नियोजन, हिशेबी-व्यावसायिक वृत्ती आणि कल्पकता यामुळे कामगार ते यशस्वी उद्योजक अन् आता मोठ्या उद्योगाचे मालक म्हणजे हरिषशेठ येवले-पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
यशस्वी उद्योजक हरिषशेठ येवले-पाटील यांचा जन्म 9 जानेवारी 1981 रोजी पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील धानोरे या छोट्याशा खेडेगावात एका सर्वसामान्य कुटुंबात झाला. गावातील जिल्हा परिषद शाळेतून त्यांनी शिक्षणाचा श्रीगणेशा केला. नववीमध्ये असताना त्यांच्या डोक्यावरील मातृछत्र हरपले; मात्र लहानपणापासून शांत, संयमी असलेले हरिषशेठ पुढे जाऊन नक्कीच मोठे नाव करतील, असा विश्वास त्यांच्या नातेवाइकांना होता.
त्यामुळे हरिषशेठ यांचे मामा असलेले श्रीक्षेत्र विठ्ठलवाडी येथील प्रगतशील शेतकरी रमेश काळूराम शिंदे आणि आजी कौशल्याबाई काळूराम शिंदे यांनी हरीष यांना त्यांच्या घरी घेऊन जात पालनपोषण करण्यास सुरुवात केली. त्यांनी दहावी, बारावीपर्यंतचे शिक्षण श्रीक्षेत्र विठ्ठलवाडी येथेच केले. पुढील शिक्षणासाठी ते कान्हूर मेसाई येथे मावशीच्या घरी गेले. त्यांच्या मावशी सुनिता नारायण पुंडे पाटील यांनी त्यांना आईच्या मायेचा आधार देत आईची ममता भरून काढली.
तद्नंतर हरिष यांनी पुणे येथे भारती विद्यापीठात मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमामध्ये प्रवेश घेऊन सणसवाडी येथील नामांकित कंपनीमध्ये नोकरी मिळविली, त्यानंतर त्यांनी कौशल्याच्या जोरावर याच भागातील आंतरराष्ट्रीय कंपनीमध्ये इंजिनिअरपदी बढती घेतली; मात्र हरिष यांना पहिल्यापासून मोठे उद्योजक बनण्याची इच्छा असल्याने त्यांचे मन कंपनीच्या नोकरीमध्ये रमत नव्हते. त्यांनी कंपनीच्या पगारातील निम्मी रक्कम व्यवसायासाठी बाजूला काढून ठेवण्यास सुरुवात केली.
साठवलेल्या पैशांतून जागा खरेदी-विक्री करण्याचा संकल्प त्यांनी केला. 2005 मध्ये त्यांची ललित जोशी यांच्याशी ओळख झाली. जोशी यांनी हरिषशेठ यांच्यामधील अनेक गुण हेरले अन् त्यांच्या मालकीची शिक्रापूर एल अँड टी फाटा येथील जमीन हरिषशेठ यांना मोठ्या विश्वासाने पैसे नसताना देखील विक्री केली. तेथे हरिषशेठ यांनी गुंठेवारी करीत त्यांनी जमीन विक्री करीत मिळालेल्या पैशांतून स्वतःचा फायदा न पाहता प्रथम जोशी यांचे पैसे देऊ केले अन् हरिषशेठच्या उद्योजकतेला खरी सुरुवात झाली. हरिषशेठ हे कार घेण्याचे स्वप्न पाहात असताना त्यांनी स्वतः एक छोटीशी कार घेतली; मात्र नंतर स्वतः मोठी आलिशान कार खरेदी करणार, अशी खूणगाठ मनाशी बांधून कष्ट करण्यास सुरुवात केली.
हरिषशेठ यांचा स्वभाव, व्यवसायातील जिद्द, प्रामाणिकपणा पाहून जोशी यांनी पुन्हा हरिषशेठ यांना वेगवेगळ्या ठिकाणी जागा उपलब्ध करून देत त्यांची पुण्यातील कुमार बिल्डर, गोदरेज प्रॉपर्टी, सिद्धिविनायक कंस्ट्रक्शन या कंपन्यांच्या संचालकांशी ओळख करून देत त्यांच्यासोबत देखील काही प्रकल्पांमध्ये त्यांना घेतले. या सर्व अनुभवाच्या जोरावर 2004 मध्ये हरिषशेठ यांनी स्वतःच्या “घनोबा डेव्हलपर्स’ नावाने पुणे-नगर महामार्गालगत जागा उपलब्ध करून घेऊन त्यांच्या व्यवसायाचा “श्रीगणेशा’ केला.
प्रत्येक क्षेत्राशी सलोख्याचे संबंध
पाच एकर जमिनीची अनेक एकर जमीन ते कंपनी कामगार ते सध्याच्या स्वतःच्या प्रकल्पामध्ये 20 युवकांना रोजगार अशी अनोखी वाटचाल नक्कीच सर्व युवकांना प्रेरणादायी ठरत आहे. असंख्य युवकांचे जवळील जीवलग मित्र, तर असंख्य अधिकारी आणि राजकीय नेत्यांशी सलोख्याचे संबध असे आगळेवेगळे व्यक्तिमत्त्व म्हणजे हरिषशेठ केरबा येवले पाटील.
या गावांमध्ये “घनोबा’चा डंका
शिक्रापूर, राऊतवाडी, रांजणगाव गणपती, कासारी, खंडाळे, कोंढापुरी, पिंपळे जगताप, कोरेगाव भीमा, शिरूर येथे “घनोबा डेव्हलपर्स’ने स्वतःच्या हिमतीवर प्रकल्प उभे केले असून त्यास उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला. हा उत्स्फूर्त प्रतिसाद केवळ हरिषशेठ यांची सचोटी, कल्पकता, नावीन्य, दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण सेवा, ग्राहकांची विनम्र वागणे या गुणांमुळे मिळाला.
घर हवे तर “घनोबा डेव्हलपर्स’चे असेच ग्राहकही म्हणतात. पुणे जिल्ह्यातील सर्वांत मोठे गाव असलेल्या शिक्रापूर येथे त्यांचा 21 एकर जागेमध्ये मोठा प्रकल्प उभा राहिलेला असल्याने हरिषशेठ यांचे उद्योजक होण्याचे स्वप्न साकार झाले. त्यांच्या मोठ्या आलिशान कारचे स्वप्न देखील त्यांनी नुकतेच पूर्ण करून युवकांना एक प्रेरणा दिली. आज अनेकांच्या हृदयातील ते ताईत बनले आहेत.
शाळेविषयीही तेवढाच जिव्हाळा
“आपण ज्या शाळेत शिकलो, मोठे झालो त्या शाळेला आपण विसरायचे नसते’ असे म्हणतात त्या उक्तीप्रमाणे हरिषशेठ यांनी गावातील शाळेला संगणक, फर्निचर यांसह शालोपयोगी साहित्य भेट दिले. कोरेगाव भीमा येथील मूकबधीर शाळेसाठी देखील मदत करत परिसरातील अनेक मंदिरांना देखील देणगी रूपाने मदत केली आहे.
आपल्याकडे काय नाही आहे, याचा विचार करीत कुढत बसू नका. उलट तुमच्याकडे काय आहे त्याचा पॉझिटिव्ह विचार करा. आपल्या बलस्थानांवर भर द्या. त्यांच्यायोगे तुम्ही उणिवांवर मात करू शकता. भांडवल नसले तरी कष्ट करायची तयारी असेल तर प्रतिकूल परिस्थितीतूनही मार्ग काढता येतो.
-हरिषशेठ येवले-पाटील, चेअरमन, घनोबा डेव्हलपर्स