मुंबई – हरिद्वार येथे होणाऱ्या कुंभमेळ्याच्या तयारीचा राष्ट्रीय साथरोग नियंत्रण केंद्राच्या संचालकांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय पथकाने आढावा घेतला. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने या आढाव्यानंतर कुंभमेळा काळात करोनाचा उद्रेक होण्याचा इशारा दिला होता. यातच मिळलेल्या माहितीनुसार, या महाकुंभमेळ्यात दुसऱ्या शाहीस्नानानंतर १०२ साधू व भाविक करोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. कुंभमेळ्याच्या बाराव्या दिवशी दुसरं शाही स्नान पार पडलं. पवित्र स्नानासाठी साधूंसह भाविकांनी अलोट गर्दी केली होती. तर दुसरीकडे कुंभमेळ्यात करोना नियमांची अंमलबजावणी करताना प्रशासन हतबल झालं आहे. याच मुद्यावरून शिवसेनेन सामानाच्या अग्रलेखातून “हरिद्वारच्या कुंभमेळ्याने करोनाचा अणुबॉम्बच फोडला” असं म्हणत टीका केली आहे.
कोरोनातून जगवण्यासाठी लॉक डाऊन लादायचे व लॉक डाऊन काळात लोकांना भूक , बेरोजगारीने मारायचे या चक्रातून महाराष्ट्र सरकारने लोकांना बाहेर काढले आहे . कुंभमेळा , मरकज , रमजान यावर कोरोनाचेच गिधाड फडफडत आहे . लोक गांभीर्याने घेत नाहीत तेव्हा सरकारला गांभीर्याने घ्यावे लागते . कोरोनाच्या लढाईत सगळय़ांचीच साथ हवी , संयम हवा . मुख्य म्हणजे सरकारवर विश्वास हवा . मुख्यमंत्री ठाकरे यांनी लॉक डाऊन केले तर लोक रस्त्यावर उतरतील असे विरोधी पक्ष ओरडत होता . तसे काहीच घडताना दिसत नाही . लोकांनी मुख्यमंत्र्यांचे ऐकले आहे . विरोधी पक्षाने 1 मेपर्यंत घरीच बसावे !
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात पंधरा दिवसांसाठी कडक निर्बंधांची घोषणा केली आहे. 1 मेच्या सकाळपर्यंत राज्यात संचारबंदी म्हणजे 144 कलम लागू करून कोरोनाविरुद्धच्या दुसऱया लढाईचे रणशिंग फुंकले आहे. कडक निर्बंध म्हणजे एकप्रकारे लॉक डाऊनच आहे, पण मुख्यमंत्री ठाकरे यांनी मंगळवारी रात्री जनतेला विश्वासात घेऊन या लॉक डाऊनची घोषणा केली. त्याआधी सात-आठ दिवस सरकार लॉक डाऊनसंदर्भात जनतेची मानसिकता तयार करीत होते. सरकारच्या मनात आले म्हणून मागचा पुढचा विचार न करता लॉक डाऊन लादले असे केले नाही.
मुख्यमंत्री सांगतात, ‘हे निर्बंध मी आनंदाने लादत नाही. परिस्थिती इतकी वाईट झाली आहे की, प्राण वाचवणे यालाच आपले पहिले प्राधान्य हवे.’ मुख्यमंत्र्यांनी योग्य तेच सांगितले. परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. डॉक्टर्स, बेड्स, व्हेंटिलेटर्स आणि ऑक्सिजनचा तुटवडा पडावा इतके कोरोना संक्रमण वाढत आहे. मंगळवारी 60 हजारांवर कोरोना रुग्ण महाराष्ट्रात झाले. हे चित्र भयावह आहे. कोरोनासंदर्भातली आणीबाणी फक्त महाराष्ट्रातच उद्भवली आहे काय? संपूर्ण देशच कोरोनाच्या जबडय़ात अडकला आहे. महाराष्ट्र लपवाछपवी करून रुग्णांचा आकडा लपवत नाही.
कारण खोटेपणा महाराष्ट्राच्या मातीत रुजलेला नाही. हरिद्वारच्या कुंभमेळय़ाने कोरोनाचा अणुबॉम्बच फोडला. देशभरात कोरोना धुमाकूळ घालीत असताना धर्म, सण, उत्सव यावर नियंत्रण ठेवावेच लागेल. कुंभमेळय़ात सहभागी झालेल्या शेकडो साधू-संत आणि गंगेत डुबकी मारणाऱ्या पवित्र आत्म्यांना कोरोना झाला आहे. आता हे लोण पसरत जाईल. उत्तर प्रदेशात मंगळवारी एका दिवसात 18 हजार कोरोना रुग्ण आढळून आले. आठवडाभरात त्या राज्यात कोरोना रुग्णसंख्येत 204 टक्के एवढी वाढ झाली आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे तर साधू – संन्यासी – तपस्वी , पण ते स्वतःच विलगीकरणात पोहोचले.