नवी दिल्ली : गुजरातमधील पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल यांनी नुकतेच काँग्रेसला रामराम ठोकला आहे. दरम्यान, पटेल हे कोणत्याही क्षणी भाजपात प्रवेश करू शकतात, अशा चर्चांना ऊत आला आहे. या पार्श्वभूमीवर हार्दिक पटेल यांचे मोठे वक्तव्य आज समोर आले आहे.
हार्दिक पटेल यांना भाजप प्रवेशाबाबत काल एका कार्यक्रमात प्रश्न विचारण्यात आला. सोमवारी तुम्ही भाजपात प्रवेश करणार का? असा थेट सवाल माध्यम प्रतिनिधींनी केल्यानंतर पटेल यांनी “मी सोमवारी भाजपात प्रवेश करणार नाही, असं काही असेल तर तुम्हाला कळवू.” असे म्हटले. त्यामुळे सोमवारी हार्दिक पटेल भाजपात प्रवेश करणार नाहीत, हे जवळपास स्पष्ट झालं आहे. पण भविष्यात ते भाजपात प्रवेश करण्याचा विचार करू शकतात, याबाबत तर्क वितर्क लावले जात आहेत.
दुसरीकडे, हार्दिक पटेल यांनी प्रसिद्ध गायक सिद्धू मूसावाले यांच्या हत्येवरून पंजाबमधील भगवंत मान सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. त्यांनी एक ट्वीट करत म्हटले की, “कोणतंही सरकार अराजक हातात जाणं किती घातक असू शकतं, याचा प्रत्यय नुकतंच पंजाबमध्ये घडलेल्या घटनेनं आला. पंजाबमध्ये काही दिवसांपूर्वी एका आंतरराष्ट्रीय कबड्डीपटूची निर्घृण हत्या करण्यात आली होती. त्यानंतर आता एक प्रसिद्ध तरुण गायक सिद्धू मूसावाले यांची हत्या झाली. यामुळे आज अनेक महत्त्वाचे प्रश्न उपस्थित होत आहेत.”
हार्दिक पटेल हे गुजरातमधील पाटीदार समजाच्या आंदोलनाचा प्रमुख चेहरा होते. काही महिन्यांपूर्वी त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. मात्र अंतर्गत कलहामुळे त्यांनी अलीकडेच काँग्रेस पक्षातून राजीनामा दिला. त्यानंतर ते भाजपात प्रवेश करतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. पण हार्दिक पटेल यांनी तूर्तास तरी सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे.