अहमदाबाद – हार्दिक पटेल यांनी बबुधवारी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकला. अशातच गुजरात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जगदीश ठाकोर यांनी, राजद्रोहाच्या गुन्ह्यात तुरुंगात जावे लागण्याच्य भीतीने हार्दिक पटेल यांनी हे पाऊल उचलले असल्याचा आरोप केला आहे. हार्दिक पटेल सत्ताधारी भाजपमध्ये सामील होऊ शकतात, असा दावाही ठाकोर यांनी यावेळी केला. पटेल यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेतल्यानंतर लगेचच काँग्रेस नेते ठाकोर यांनी हे दावे केले आहेत.
पक्षाच्या प्रदेश कार्याध्यक्षपदी असतानाही आपल्याला कोणतेही अर्थपूर्ण काम दिले जात नसल्याचा आरोप पटेल यांनी केला होता. पक्षाकडे कोणतेही व्हिजन नाही आणि त्यांची राज्य युनिट जातीवर आधारित राजकारण करत असल्याचा आरोपही पटेल यांनी केला.
गुजरातमधील विधानसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या असतानाच हार्दिक पटेल यांनी बुधवारी काँग्रेसचा राजीनामा दिला. यावेळी त्यांनी, काँग्रेसचे वरिष्ठ नेत्यांचं लक्ष केवळ त्यांच्या मोबाईल फोनमध्ये असत आणि गुजरात काँग्रेसचे नेते त्यांच्यासाठी चिकन सँडविचची व्यवस्था करण्यात व्यस्त असतात.
हार्दिक पटेल यांनी राहुल गांधी यांच्या उपस्थितीतील काँग्रेस प्रवेशाच्या एका वर्षानंतर जुलै 2020 मध्ये त्यांना गुजरात काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष बनवण्यात आले होते.
‘पटेल यांनी पत्रकार परिषदेत जे काही सांगितले आणि त्यांच्या राजीनामा पत्रात जे काही लिहिले होते ते सत्ताधारी भाजपने तयार केले होते.’ असा दावा ठाकोर यांनी केला. ‘हार्दिकला भीती वाटत होती की, काँग्रेसमध्ये राहिल्यास देशद्रोहाच्या खटल्यात तुरुंगात जावे लागेल. त्यामुळे संभाव्य शिक्षेपासून वाचण्यासाठी त्यांनी काँग्रेस सोडण्याचा निर्णय घेतला आणि ते भाजपमध्येही प्रवेश करू शकतात.’ असा दावाही ठाकोर यांनी यावेळी केला.
एकेकाळी पाटीदार समाजाच्या आरक्षण आंदोलनाचे नेते असलेले पटेल यांच्यावर गुजरातमध्ये सुमारे २५ फौजदारी खटले दाखल आहेत. यामध्ये अहमदाबाद आणि सुरत येथे राजद्रोहाच्या आरोप असलेल्या गुन्ह्यांचा देखील समावेश आहे. कार्याध्यक्ष असूनही बाजूला सारण्यात आल्याच्या आणि कोणतेही महत्त्वाचे काम न दिल्याच्या हार्दिक पटेल यांच्या आरोपांचे खंडन करताना ठाकोर यांनी, पाच राज्यांमध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत पक्षाने त्यांना स्टार प्रचारक बनवले होते. याची आठवणही करून दिली.