अहमदाबाद : कॉंग्रेस पक्षात सक्रिय असणारे गुजरातमधील पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल यांचा काही दिवसांपासून ठावठिकाणा माहीत नसल्याची बाब पुढे आली आहे. त्याविषयीचा दावा खुद्द हार्दिक यांच्या पत्नी किंजल यांनी केला आहे.
पाटीदार समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठीच्या आंदोलनात सहभागी झालेल्यांवर गुजरातमध्ये अनेक गुन्हे दाखल झाले आहेत.
ते गुन्हे मागे घेण्यासाठी राज्य सरकारवर दबाव टाकण्याच्या उद्देशातून पाटीदार नेते रणनीती ठरवत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून सोमवारी येथे पाटीदार नेत्यांची बैठक झाली. त्या बैठकीत किंजल यांनी चक्रावून टाकणारा दावा केला. हार्दिक यांना 18 जानेवारीला अटक झाली. त्यानंतर त्यांचा ठावठिकाणा आम्हाला समजलेला नाही. मात्र, ते कुठे आहेत हे विचारण्यासाठी पोलीस वारंवार आमच्या घरी येतात, असे त्यांनी म्हटले.
सुमारे चार-पाच वर्षांपूर्वीच्या आंदोलनावरून हार्दिक यांच्या विरोधात देशद्रोहाचे विविध गुन्हे दाखल आहेत. तशाच एका प्रकरणाच्या सुनावणीसाठी न्यायालयात गैरहजर राहिल्यावरून हार्दिक यांना मागील महिन्यात अटक करण्यात आली. त्यानंतर त्यांना चार दिवसांनी जामीन मंजूर झाला.
मात्र, त्यांना लगेचच इतर दोन प्रकरणांत अटक करण्यात आली. त्याप्रकरणी त्यांना पुन्हा 24 जानेवारीला जामीन मिळाला. आता पुन्हा न्यायालयात गैरहजर राहिल्याने त्यांच्या विरोधात 7 फेब्रुवारीला अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले आहे.