मुंबई – भारतीय संघाचा अष्टपैलू क्रिकेटपटू हार्दिक पंड्या याने आपण पुनरागमनासाठी सज्ज असल्याचे सिद्ध करत डॉ. डी. वाय. पाटील टी-20 क्रिकेट स्पर्धेत रिलायन्स वन संघाकडून खेळताना 55 चेंडूत नाबाद 158 धावांची वादळी खेळी केली. या खेळीत त्याने तब्बल 20 षटकार फटकावले.
गतवर्षी इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वकरंडक स्पर्धेनंतर पंड्याला दुखापतीमुळे गेले अनेक महिने क्रिकेटपासून लांब राहावे लागले होते. त्याच्यावर इंग्लंडमध्ये उपचार झाल्यानंतर तो काही काळ विश्रांती घेत होता. त्यानंतर त्याने सरावास प्रारंभ केला. येथे सुरू असलेल्या टी-20 लीग स्पर्धेत त्याने सहभागी होत रिलायन्स वन संघाकडून प्रत्येक सामन्यात धमाकेदार खेळ केला आहे. पुनरागमन केल्यापासून पंड्या प्रतिस्पर्धी गोलंदाजांवर वर्चस्व गाजवत आहे.
शुक्रवारी रिलायन्स वन आणि बीपीसीएल यांच्यातील सामन्यात पंड्याने नाबाद दीडशतकी खेळी केली. पंड्याच्या खेळीच्या जोरावर रिलायन्स वन संघाने 4 बाद 238 धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना बीपीसीएल संघाचा डाव केवळ 134 धावांत संपुष्टात आला व रिलायन्स वन संघाने 104 धावांनी विजय मिळविला.