मुंबई – इंग्लंडविरुद्धच्या दिवस-रात्र कसोटी सामन्यासाठी अष्टपैलू हार्दिक पंड्याचा अंतिम संघात समावेश करण्यात यावा. तसेच जर तो गोलंदाजी करू शकत असेल तर त्याचा अतिरिक्त लाभ संघाला होईल, असा सल्ला विक्रमादित्य सुनील गावसकर यांनी दिला आहे.
जर पंड्या गोलंदाजी करण्यास समर्थ असेल तर त्याला संघात स्थान देण्यात यायला हवे. तिसरा कसोटी सामना अहमदाबादला होत आहे. मोटेराची खेळपट्टी नवीन असल्याने तेथे कशाप्रकारची खेळपट्टी असेल हे सांगणे कठीण आहे. पण या सामन्यात विराट कोहलीने तीन वेगवान गोलंदाज व दोन फिरकी गोलंदाजांसह मैदानात उरतावे.
कुलदीप यादवच्या जागी जसप्रीत बुमराहला संघात घेण्यात आले पाहिजे. बुमराह, इशांत शर्मा व महंमद सिराज या तीन वेगवान गोलंदाजांना गुलाबी चेंडूने चांगली कामगिरी करता येऊ शकते, असेही ते म्हणाले.
गुलाबी चेंडूची कसोटी असल्याने कुलदीपच्या फिरकीला तेथे फारसा वाव मिळणार नाही. प्रकाशझोतात सामना खेळताना फिरकीपटू फारसे प्रभावी ठरत नाहीत. त्यामुळे कुलदीपच्या जागी बुमराहला संघात घ्यायलाच हवे. तसेच पंड्या हाच भारतीय संघासाठी ट्रम्पकार्ड ठरू शकेल, असेही गावसकर म्हणाले.