मुंबई – दुखापतीतून सावरलेला भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू हार्दिक पंड्या याने नवी मुंबईत सुरू असलेल्या डी. वाय. पाटील टी-20 स्पर्धेतील सीएजी संघाविरुद्धच्या सामन्यात धडाकेबाज शतक फटकावले. मंगळवारी झालेल्या या सामन्यात पंड्याने केवळ 37 चेंडूत 10 षटकार व 8 चौकारांची आतषबाजी केली. अखेर 39 चेंडूत 105 धावा करून तो बाद झाला.
रिलायन्स वन संघाकडून चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या पंड्याने संपूर्ण मैदान गाजवले. केवळ 25 चेंडूत अर्धशतक साकार केल्यानंतर पंड्याने नंतरच्या 12 चेंडूत शतकी मजल मारली.
पंड्याला सप्टेंबर महिन्यात टी-20 सामन्यात दुखापत झाली होती. तो उपचारासाठी लंडनला गेला होता. तो दुखापतीतून पूर्ण सावरला असून आगामी टी-20 विश्वकरंडकासाठी आपण सज्ज असल्याचेच त्याने या खेळीत दाखवून दिले.