Hardik Pandya Fined for Hitting Bells : मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याची साडेसाती संपण्याचे नाव घेत नाही. त्याच्या नेतृत्वाखालील मुंबईचा संघ आधीच आयपीएल २०२६ च्या प्ले-ऑफ शर्यतीतून बाहेर पडला आहे. अशा परिस्थितीत उरलेले औपचारिक सामने खेळत असताना आता कोलकाता नाइट राइडर्सविरुद्धच्या (KKR) सामन्यात हार्दिकने मैदानावर एक मोठी चूक केली. त्याच्या या गैरवर्तनावर बीसीसीआयने कडक कारवाई केली आहे. मॅच फीच्या १० टक्के दंड अन् डिमेरिट पॉईंट! (Hardik Pandya Fined) आयपीएलने अधिकृत प्रसिद्धीपत्रक जारी करून हार्दिक पंड्याला (Hardik Pandya) शिक्षा सुनावली आहे. कोलकाता येथील ईडन गार्डन्स मैदानावर खेळल्या गेलेल्या सामन्यात आयपीएलच्या आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी हार्दिकवर त्याच्या मॅच फीच्या १० टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. यासोबतच त्याच्या खात्यात एक ‘डिमेरिट पॉईंट’ देखील जोडण्यात आला आहे. हार्दिकने आयपीएल आचारसंहितेच्या ‘लेव्हल १’ मधील कलम २.२ चे उल्लंघन केल्याचे सिद्ध झाले आहे, जे मैदानातील साहित्याची किंवा उपकरणांची तोडफोड आणि गैरवापराशी संबंधित आहे. नेमकी काय होती हार्दिकची ‘ती’ चूक? (Hardik Pandya Fined) 🚨 Hardik Pandya fined 10% of his match fee and handed one Demerit Point for forcefully knocking off the bails during KKR’s chase 👀#IPL2026 pic.twitter.com/P7lKQGOTSB — OneCricket (@OneCricketApp) May 21, 2026 हा संपूर्ण प्रकार कोलकाताच्या डावातील १० व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर घडला. सामन्यात अपेक्षित यश मिळत नसल्याने निराश झालेला हार्दिक पंड्या गोलंदाजी संपवून जेव्हा आपल्या रनअपवर परत जात होता, तेव्हा त्याने संतापाच्या भरात विकेटवरील बेल्स हाताने जोरात मारून खाली पाडल्या. त्याची ही कृती कॅमेऱ्यात कैद झाली आणि पंचांनी याची गंभीर दखल घेतली. हार्दिकनेही आपली चूक मान्य केल्यामुळे या प्रकरणावर कोणतीही औपचारिक सुनावणी झाली नाही. हेही वाचा – Rohit Sharma Record : हिटमॅनला कोणाची नजर लागली? ज्या ईडन गार्डन्सवर २६४ धावांचा महाविक्रम रचला, तिथेच २०१७ नंतर रोहितची अवस्था बिकट! पुनरागमनानंतरही हार्दिक आणि मुंबई फ्लॉप! दुखापतीमुळे काही सामने न खेळल्यानंतर हार्दिक या सामन्यातून पुनरागमन करत होता. मात्र, बॅट आणि बॉल दोन्हीने तो अपयशी ठरला. मुंबई इंडियन्सने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ८ बाद अवघ्या १४७ धावा केल्या होत्या, ज्यात हार्दिकने २७ चेंडूंत केवळ २६ धावांची संथ खेळी केली. गोलंदाजीत त्याने २ षटकांत १३ धावा दिल्या, पण त्याला एकही विकेट मिळाली नाही. केकेआरने हे आव्हान १८.५ षटकांत ६ गडी गमावून पूर्ण केले आणि ४ विकेट्सने सामना जिंकला. पराभवाच्या पाठोपाठ मिळालेल्या या दंडामुळे हार्दिकच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे.