बडोदा – भारतीय क्रिकेट संघाचे अष्टपैलू क्रिकेटपटू हार्दिक आणि कृणाल पंड्या या बंधूंना शनिवारी पितृशोक झाला आहे. त्यांचे वडील हिमांशू पंड्या यांचे शनिवारी सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांचे वय वर्षे 71 होते.
एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार भारतात सध्या सुरू असलेल्या सय्यद मुश्ताक अली टी-20 स्पर्धेत बडोदा संघाचा कर्णधार असलेल्या कृणाल पंड्याने त्याला ही दु:खद बातमी समजताच
स्पर्धेतून माघार घेतली आहे. कृणालने स्पर्धेतील पहिल्या सामन्यात उत्तराखंडविरुद्ध 76 धावांची निर्णायक खेळी केली होती. तसेच आतापर्यंत 3 सामन्यात 4 विकेट्स घेतल्या आहेत. या कामगिरीसह त्याच्या नेतृत्वाखाली बडोदाने तिन्ही सामने जिंकून एलिट ग्रुुप सी मध्ये अव्वल क्रमांक मिळवला आहे.
दुसरीकडे हार्दिक पंड्या हा सय्यद मुश्ताक अली टी-20 स्पर्धेत सहभागी झालेला नाही. तो सध्या इंग्लंडविरुद्ध पुढील महिन्यात सुरू होणाऱ्या मालिकांसाठी मुंबईत तयारी करत होता. तोही मुंबईवरून बडोद्याकडे रवाना झाला आहे.
याबाबत बडोदा क्रिकेट असोसिएशनचे सीईओ शिशीर हट्टंगडी म्हणाले, कृणाल पंड्याने सय्यद मुश्ताक अली टी-20 स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच्यावर दु:खद वेळ आली आहे. बडोदा क्रिकेट असोसिएशन हार्दिक आणि कृणाल यांच्यावर कोसळलेल्या या दु:खाप्रती शोक व्यक्त करत आहे. दरम्यान, भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली, सचिन तेंडुलकर यांच्यासह भारतीय संघातील आजी-माजी खेळाडूंनी हिमांशू पंड्या यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.