श्रमिकांचा लॉकडाऊनला विरोध : राज्य, केंद्र शासनाकडे मागणी
पिंपरी – करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केलेल्या लॉकडाऊनमुळे असंघटित क्षेत्रातील सर्व कामगारांवर फार मोठा परिणाम झाला असून आजपर्यंत कर्जे काढून जगत आहेत. जवळची सर्व पुंजी संपली, आता कसेतरी काम मिळतयं, कडक निर्बंध गरजेचे आहे मात्र पुन्हा लॉकडाऊन झाल्यास करोनाने नाहीतर उपासमारीने मरु म्हणून पुन्हा लॉकडाउन नको, अशी साद कष्टकरी वर्गाने राज्य व केंद्र शासनाकडे आज केली आहे.
वर्किंग पीपल चार्टर व कष्टकरी संघर्ष महासंघातर्फे लॉकडाऊननंतरचे वर्ष याबाबत कष्टकऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी महासंघाचे अध्यक्ष काशिनाथ नखाते, उपाध्यक्ष राजेश माने, उमेश ड़ोर्ले, विनोद गवई, इरफान चौधरी, माधुरी जलमुलवार, वंदना थोरात, सीमा शेख रूपाली शिंदे, राणी शारद, सपना जाधव, पल्लवी देवकुळे, विमल झोबाडे, जालिंदर गायकवाड, युवराज काळे, मधुकर वाघ आदी उपस्थित होते.
यावेळी नखाते म्हणाले की, लॉकडाऊनमध्ये श्रमिक वर्गातील बहुतांशी कामगारांचा रोजगार हिरावला आहे. बेरोजगारांचे प्रमाण वाढले आहे. अनेक कामगार कर्जाऊ रक्कम घेऊन कुटुंब चालवत आहेत. असे असताना आता पुन्हा एकदा लॉकडाऊनची शक्यता आहे. याचा श्रमिक वर्गाला मोठा फटका बसू शकतो त्यामुळे पुन्हा लॉकडाऊन नको, अशी मागणी करण्यात आली.