प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 9 – स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना निश्चितपणे “हर घर तिरंगा’ लावला पाहिजे; परंतु त्याचबरोबर भारतीय संविधानदेखील आपल्या सर्वांसाठी तेवढेच महत्त्वाचे आहे. म्हणून केंद्र शासनाने घोषित केलेली “हर घर तिरंगा’ ही घोषणा “हर घर संविधाना’शिवाय अपूर्ण ठरणार आहे, अशी भावना ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव यांनी व्यक्त केली.
मार्केटयार्डातील जय शारदा गजानन मंदिरात सर्व बाजार आवारातील घटकांची बैठक ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी (दि.8) आयोजित केली होती. त्या वेळी डॉ. आढाव बोलत होते. ते म्हणाले, आपण सध्या अनुभवत असलेले दांभिक राष्ट्रवाद, धार्मिक ध्रुवीकरण, लोकशाहीची गळचेपी आणि जीवनावश्यक वस्तूंच्या भाववाढीने देशासमोर मोठे आव्हान उभे केले आहे.
या स्थितीचा निषेध करण्यासाठी आणि विविध समस्यांवर शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रीय एकात्मता समिती दि. 9 ऑगस्ट क्रांती दिन ते 15 ऑगस्टदरम्यान “जन की बात हर घर संविधान’ अभियान राबविणार आहे. या क्रांती सप्ताहाची सुरुवात बुधवार पेठेतील हुतात्मा स्मारक मजूरअड्डा येथून सकाळी नऊ वाजता मोर्चाने होणार आहे.
यावेळी कामगार युनियनचे अध्यक्ष संतोष नांगरे, आडते असोसिएशनचे अध्यक्ष बाप्पू भोसले, माजी अध्यक्ष विलास भुजबळ, संदीप कटके, हमाल पंचायतीचे गोरख मेंगडे, तोलणार संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र चोरगे, राजेश मोहोळ, हनुमंत बहिरट, महात्मा फुले कामगार संघटनेचे राजू पवार, विशाल केकाने, सूर्यकांत चिंचवले, विकास थोपटे, शशिकांत नांगरे, संजय साष्टे, किसन काळे, टेम्पो संघटनेचे गणेश जाधव, चंद्रकांत जावळकर, संजय सातपुते आदी उपस्थित होते.