नमस्कार गुरुजी, काय कसं काय चाललय?” छान आहे हो, दररोज समोरची मुले आनंद देतात. “”तुमचं काय?”” “”काही नाही, राहिलेले दिवस काढतोय!’ “का?’ “तीन महिने राहिलेत फक्त,’ “बरं मग?’ “नमस्कार जगदाळे साहेब कसे आहेत? काय म्हणते बॅंकेची नोकरी,’ “चाललीय. आमचेपण फक्त चारच महिने!’ “म्हणजे जून एन्डच का?’ शेळके सरांनी विचारले व मानेनेच होकाराने जगदाळे साहेबांनी उत्तर दिले.
सकाळी बागेतील फिरणे म्हणजे जणू स्नेहमेळावाच असतो. काही नुकतेच नोकरीस लागलेले, काही सेवानिवृत्त झालेले तर काही थोड्या दिवसांनंतर सेवानिवृत्त होणारे, दररोज एकत्र सकाळी भेटत असतात. जगदाळे साहेबांनी गुरूजींना विचारले, “तुमचे तीनच महिने म्हणजे मे एन्ड का?’ “हो. म्हणजे सगळे शासकीय वाढदिवसवाले!’ गुरूजी म्हणाले, “अहो आमच्या त्यावेळचे गुरूजी, आला पोरगा शाळेत की एकच काम करायचे, त्याचा उजवा हात डाव्या कानाला लावायचा आणि सहा वर्षांचा समजून त्याला शाळेत घालायचे आणि त्यावेळी शाळा एक जूनला भरायची म्हणून, काहींची जन्मतारीख एक जून, तर जो दुसऱ्या दिवशी येईल त्याची जन्मतारीख दोन जून लावायचे.’
बाबर गुरूजी सर्वांना सांगत होते. सत्तरच्या दशकापर्यंत तरी अशीच जन्मतारीख लावायचे. असो पण एक मात्र चांगले झाले. आई, वडील, आजी आजोबा स्वत: शिकले नाही; पण आपल्याला शाळेत तरी घातले आणि गुरूजींनी मनापासून शिकवले. म्हणून आज हे दिवस पहायला मिळत आहेत. जगदाळे साहेबांनी यास संमती दिली व म्हणाले, “आमची मुलं आता वाढदिवस साजरा करतात. पण आम्ही मुलं होईपर्यंत कधी तो साजरा केला नाही, ती जन्मतारीख काय? याचा शोध घेत बसलो नाही. जे मिळाले त्यातच समाधान मानले.’ बागेतील स्नेहमेळावा म्हणजे दररोजच्या गप्पागोष्टी आणि त्यात गावापासून दिल्लीपर्यंत आणि दिल्लीपासून अमेरिकेपर्यंत काय चालले याचा जणू धावता आढावाच असतो. फिरण्यानंतर किरकोळ जमेल तसा व्यायाम आणि चहा घेणे नित्याचेच असते.
सेवानिवृत्त झालेल्याचे दररोजचे नित्यनियम ठरलेले असतात. तर त्यांनी लावून घेतलेली कामे असतातच. काहींची मुले नोकरीला, मुलींची लग्न झालेली, त्यामुळे नातवंडात समाधान मानत जीवन आनंदात घालवत असतात. हे भाग्यवान आईवडिलांनी लवकर लग्ने लावून दिली याचा फायदा. मुलांची लग्ने लवकर झाली व जे ते आपापल्या पायावर उभे राहिले. पण कुलकर्णी साहेब अजूनही चिंतेत दिसत होते. त्यांचे नोकरीचे पाचच वर्षे राहिले आहेत आणि अजून मुलीचे लग्न नाही तर मुलगा दहावीत शिकतोय, याचीच काळजी सतत त्यांना लागून होती. यातच शेळके सरांनी कुलकर्णी नानांना विचारले, “काय नाना, पुढे काय?’ “काही नाही हो आम्हाला रिटायर नंतर पुन्हा नोकरी शोधावी लागणार आहे. तुमचं बरंय’, असं म्हणून ते कामाला जायच्या घाईने निघून गेले.
उरलेली सर्व मंडळी चहाच्या निमित्ताने एकत्र आली. पुन्हा गप्पा सुरू झाल्या. त्यात जमादार चाच्यांची भर पडली. काही म्हणा पण रिटायर होण्यापूर्वी आपल्याला काय करायचे याची काळजी घेतली पाहिजे असे गुरुजी सांगू लागले. “आपण आजवर कधीही कष्टाची कामे केलेली नसतात. या वयात ती होत नाहीत पण काही लोक विनाकारण मला अजून सगळं जमतं याचा आव आणतात. आणि नको त्या संकटात पडतात. मागच्याच आठवड्यात आमचे मित्र गावी शेती करायला गेले आणि झाड तोडत बसले आणि त्यांना त्रास झाला. म्हणून म्हणतो जे जमेल ते करा, या वयात काही सहन होत नाही. जबाबदारी पेलण्याची ताकद शरीराला व मनाला नसते’.जमादार चाचा मध्येच म्हणाले, “ये सब सही है! जितना होता है उतना ही करने का, नही तो प्रॉब्लेम होता है।’ सेवानिवृत्त होणाऱ्या जगदाळे साहेबांनी मध्येच सांगायला सुरुवात केली, “काही नाही मिळवणारे पैसे बॅंकेत ठेवा, आरोग्याची काळजी घ्या! जमेल तसे भारतात व बाहेरच्या देशात फिरत आनंद घ्या, आरोग्य उत्तम राहील. कोणताही ताण येणार नाही याची काळजी घेणे महत्त्वाचे आहे.’
जमादार चाचा म्हणाले, मी पण नोकरीत असताना पोरासाठी गाडी घेतली होती. त्याला कामाला लावून दररोज पैसे कमवीत त्याचा घरसंसार चालवेन असे वाटले होते. परंतु काहीच काम मिळत नव्हते. कर्जाचे हप्ते कसे फेडायचे याचा विचार झोपू देत नव्हता. काही जण तर रिटायर झाल्यावर नवीन जागा घेतात, ज्याचा अनुभव नाही तो धंदा टाकतात, निष्कारण कर्ज काढतात आणि मग नको तो धंदा टाकतात, मग नको ते आजार मागे लावून घेतात. फक्त काळजी घ्या, आनंदाने जगा, असे पुन्हा गुरुजी सगळ्यांना सांगत होते.
शेळके साहेबांनी पुन्हा चाच्यांना विचारले, “क्या हुआ चाचा?’ त्यावर चाचा म्हणाले, “काही नाही हो, दररोज लगता था। अरे ये गाडी काम पें जाती क्यो नहीं! और श्याम को जल्दी नही आयी तो लगता था, की ये आती क्यो नही!’ हे ऐकल्यावर पुन्हा गुरुजी म्हणाले, “काळजी करू नका, आनंदी राहा, ताण घेऊ नको, आपले जुने दिवस आठवा, आज आपण खूप आनंदात आहोत. पुढचा शासकीय वाढदिवस कसा साजरा करायचा आणि दररोज आनंदी सायंकाळ कशी घालवायची याचा विचार करत प्रत्येक जण घरी गेले.
अनिल गुंजाळ
याला जीवन असे नाव .