गेल्या काही वर्षांपासून भारताची माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात विकासाची गती चांगली राहिली आहे. चहाच्या टपरीपासून कॉर्पोरेट कार्यालयापर्यंत प्रत्येक व्यक्ती तंत्रज्ञान वापरण्यावर भर देत आहे. असे असले तरी अभियांत्रिकी शिक्षणातील कालबाह्य अभ्यासक्रम, कुशल शिक्षकांचा अभाव या गोष्टींमुळे तंत्रज्ञान विकासात अडसर येत आहेत. यात तातडीने दुरुस्ती करणे अनिवार्य आहे.
भारताने नव्या युगात अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या विकासात वेगवान हालचाली केल्या आहेत. कन्सल्टंसी फर्म केपीएमजीच्या 2020 सर्व्हेनुसार आर्टिफिशियल इंटिलिजन्स, मशिन लर्निंग, ब्लॉकचेन आणि इंटरनेट ऑफ थिंग्ज (आयओटी) च्या क्षेत्रात नवीन शोध आणि संशोधनाच्या बाबतीत भारत चीनबरोबर दुसऱ्या स्थानावर पोचला आहे. यात आघाडी अमेरिकेचीच आहे. एवढेच नाही तर जगातील प्रमुख आयटी कंपन्यांचे हब असलेले बंगळूर देखील टॉप टेनमध्ये पोचले आहे. या शहराचे स्थान नववे आहे. केपीएमजीच्या मते, भारतात गेल्या काही वर्षात तंत्रज्ञानात वाढती गुंतवणूक आणि शहरीकरणामुळे नवीन तंत्रज्ञानाचा शोध आणि संशोधन करण्यास पोषक वातावरण तयार झाले आहे. याशिवाय युवावर्गाची वाढती संख्या देखील तंत्रज्ञान विकासाला कारणीभूत ठरत आहे.
काही तज्ञांच्या मते, अमेरिकेचे व्हिसाबाबतचे कठोर धोरण हे एकादृष्टीने भारत आणि चीनसाठी सकारात्मक ठरले आहे. कारण कडक नियमांमुळे अनेक तज्ञ मंडळी अमेरिकेला जाण्यापासून वंचित राहिले आणि त्यांना मायदेशी परतावे लागले. यामुळे त्यांनी आपल्या देशातच सर्वोत्तम कामगिरी केली. अर्थात भारताने गेल्या काही वर्षापासून माहिती आणि तंत्रज्ञानात भरारी घेतली असून त्याच्या वाढीस पोषक वातावरणही तयार झाले आहे. म्हणूनच जगाच्या बरोबरीने चालायचे असेल आणि भविष्यात टिकून राहयचे असेल तर तंत्रज्ञानाचा अंगिकार करावा लागेल, हे केंद्र सरकारने ओळखले. हे ध्यानात घेऊन सरकारने अनेक योजना तयार केल्या. डेटा पार्क, टाइड 2.0, (टेक्नॉलॉजी इनक्यूबेशन अँड डेव्हलपमेंट ऑफ एंटरप्रेनर्स), सीइओ (सेंटर ऑफ एक्सलेंक्स) आणि डिजिटल इंडिया या योजना आणल्या.
विशेष म्हणजे या सर्व्हेक्षणात जगभरात आयटीत काम करणाऱ्या 800 तज्ञांचा समावेश होता. त्यातील 37 टक्क्यांच्या मते, सध्याचा तंत्रज्ञानात विकासाची सुरू असलेली चढाओढ पाहता भविष्यात जगातील सर्वात मोठे इनोव्हेशन सेंटर हे सिलिकॉन व्हॅलीच्या बाहेर असेल, असे भाकित केले आहे. यासंदर्भात त्यांनी सिंगापूरचे उदाहरण दिले. ते टेक्नॉलॉजी हबच्या रुपातून सर्व्हेक्षणात आघाडीवर राहिले आहे. गेल्यावर्षी हे सिंगापूर सातव्या क्रमांकावर होते. एकाअर्थाने या सर्व्हेक्षणातून भारताचे मनोधैर्य निश्चितच वाढले आहे. परंतु भविष्यातील गरज पाहता आणखी बरेच काम करण्याची गरज निर्माण झाली आहे. केवळ बंगळूर, पुणे येथील निवडक संस्थांच्या आधारावर हे काम शक्य नाही.
अजूनही विशेषत: इंजिनिअरिंगचा अभ्यासक्रम पारंपारिकच आहे. त्यातील अनेक विषय जुने झालेले आहेत. अध्यापनाचे काम करणारे शिक्षकही नवीन तंत्रज्ञानाबाबत अनभिज्ञ आहेत. उद्योगाच्या अपेक्षाबाबत त्यांना काहीच माहिती नाही. परिणामी आपले विद्यार्थी पदव्या घेऊन भटकंती करताना दिसून येतात. त्यांना धड नोकरी मिळत नाही आणि संशोधनही करु शकत नाहीत. सध्या अभ्यासक्रम अपग्रेड करणे गरजेचे असून स्टार्टअपवरही लक्ष द्यावे लागेल. स्टार्टअप कंपन्यांना सर्वच स्तरावर मदत करावी लागेल, जेणेकरून आगामी काळात तंत्रज्ञानाच्या संशोधनात ते सक्रियपणे योगदान देऊ शकतील.
महेश कोळी
संगणक अभियंता