मुंबई : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा राणा आणि त्यांचे आमदार रवी राणा हे दाम्पत्य राजद्रोहाच्या आरोपाखाली सध्या तुरुंगात आहे. दरम्यान, जामीन अर्जावर निर्णय होणार होता. मात्र या दाम्पत्याला दिलासा मिळाला नसून त्यांच्या कोठडीतील मुक्काम बुधवापर्यंत वाढला आहे. त्यामुळे राणा दाम्पत्याला हनुमान चालिसा पठण प्रकरण चांगलच भोवल्याची चर्चा सुरू झाली आहे.
या दाम्पत्याच्या जामीन अर्जावर शनिवारी झालेल्या सुनावणीत न्यायालयाकडून निकाल राखून ठेवण्यात आला होता. त्यावरच आज फैसला होणार होता. मात्र न्यायालयाची वेळ संपल्याने आणि युक्तीवादाचे वाचन पूर्ण होऊ न शकल्याने दाखल जामीन अर्जावरील सुनावणी आता बुधवारी सकाळी पहिल्या सत्रात होणार असल्याचे सांगितले जात आहे.
राणा दाम्पत्याविरोधात १२४ अ कलमानुसार, राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या महिन्यात २३ एप्रिल रोजी राणा दाम्पत्याला अटक करण्यात आली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घरासमोर हनुमान चालिसाचे पठण करण्याच्या अट्टहासामुळे राणा दाम्पत्याला अटक कऱण्यात आली होती. तेव्हापासून हे दोघे न्यायालयीन कोठडीत आहेत.