संस्कृतीच्या खुणा : अरुण गोखले
आपले भविष्य, आपला भविष्यकाल हा उत्तम प्रकारे घडविण्याचे सामर्थ्य आपल्याच हातात आहे. त्यामुळेच आपल्या संस्कृतीने सकाळी उठल्या उठल्या आपणच आपल्या हातांची ओंजळ करून हाताचे दर्शन घ्यावे हा परिपाठ शिकविलेला आहे. तसेच त्याचे महत्त्व सांगताना असेही सांगितलेले आहे की-
कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती,
करमुले तु स्मर गोविंदम्, प्रभाते कर दर्शनम्।।
याचा अर्थ असा की आपल्या हाताच्या अग्र भागात म्हणजेच हाताच्या बोटांमध्ये श्री लक्ष्मीदेवीचा निवास आहे. त्या लक्ष्मीच्या मदतीला येणारी सरस्वती ही आपल्या हाताच्या तळव्यात आहे. आपल्या हाताच्या म्हणजेच खालच्या अर्थात मनगटाच्या भागात विष्णूचा निवास आहे. म्हणूनच मी माझ्याच अशा ईश्वरदत्त समृद्ध हाताचे सकाळी करदर्शन घेऊन माझ्या दिवसाच्या कार्याची सुरुवात करीत आहे.
खरचं! किती मोठा गुढार्थ भरलेला आहे या करदर्शनात. या संदर्भात जाणकार व्यक्तींकडून जो अधिक व्यापक खुलासा केला जातो तो असा की आपल्या हाताची दहा बोटे हीच आपल्याला अनेक वेगवेगळ्या कामांसाठी उपयोगी पडतात. लेखनाचे, कलाकुसरीचे, कलाविष्कार उदा., चित्र काढणे, वाद्ये वाजविणे, प्रसंगी शस्त्र चालविणे ह्यासारख्या कामासाठी आपली दाही बोटे फार महत्त्वाची असतात.
अर्थार्जनाच्या कामीसुद्धा ह्यांचाच उपयोग होतो. त्यांना चेतना, शक्ती, बल मिळते ते हातातील सरस्वतीच्या पाठबलाने. सरस्वतीच्या सहकार्याशिवाय लक्ष्मीची कृपा होत नाही. जोवर लक्ष्मी प्राप्त होत नाही, तोवर जीवनाला खरा अर्थ प्राप्त होत नाही.पुरुषाच्या भाग्योदयात त्याच्या मनगटात किती बळ आहे? किती सामर्थ्य आहे? ह्यावर सारे काही अवलंबून असते. ज्याचे मनगट बळकट असते ते स्वत:चे भविष्य स्वतःच्या हातानी लिहित, घडवीत असतात. ज्योतिषशास्त्रानुसार आपली आयुष्यरेषा, भाग्यरेषा, धनरेषा या आपल्याच हातावर लिखित केलेल्या असतात. त्या आपल्याला वाचता येत नाहीत इतकेच.
पण एक गोष्ट मात्र काळ्या दगडावरची रेघ आहे, ती म्हणजे आपले भाग्य घडविणारे दुसरे तिसरे कोणी नाही तर आपणच असतो. आपले भविष्य आणि भवितव्य हे आपल्याच हातात असते. त्यामुळे हाताचे भाग्यशाली दर्शन घेऊनच आपण प्रामाणिक प्रयत्नांचा नवा दिवस हा या सांस्कृतिक करदर्शनानेच सुरू करायचा असतो. ही खूण म्हणजेच कळत नकळत आपणच आपल्या कर्तृत्वाला दिलेले एक प्रकारचे आव्हान.