अरुण गोखले
निसर्गाचा हा नियमच आहे की, आपण जे पेरतो तेच उगवते. जसे की गहू पेरला तर गहूच उगवणार. गहू पेरले आणि तांदूळ उगवले असे कधी होत नाही, होणारही नाही. “जैसी करनी वैसी भरनी’ हे संत कबीरदासजींचे वचन तर आपल्याला ठाऊकच आहे.
मग प्रश्न असा शिल्लक राहतो की, आपण काय पेरतो? अनेकदा आपण काय पेरतोय आणि त्याचे भविष्यात काय परिणाम होतील याची आपल्याला पुसटशीही कल्पना नसते. आपण त्याचा विचार केलेला नसतो. पण तो विवेक आपण बाळगायलाच हवा.
या संदर्भात एक चांगलीच आठवणीत राहिलेली एक छोटी पण मोठ्या आशयाची बोधकथा आठवते.
एक नातू, छान डायनिंग टेबलावर स्टीलच्या ताटात जेवताना आपल्या आजीला मात्र एका जर्मनच्या ताटलीत जेवण वाढलं जातंय, हे काही दिवस सातत्याने पाहात असतो.
एके दिवशी त्याची आई त्याची खोली आवरत असताना तिला त्याच्या कपाटातील कप्प्यात एक जर्मनची थाळी दिसते. ती थाळी चांगल्या प्लॅस्टिकच्या आवरणात आणि व्यवस्थितपणे स्टेपल वगैरे मारून ठेवलेली असते.
आईला ते पाहून मोठे आश्चर्य वाटते. त्या बरोबरच जिज्ञासाही वाटते की सोनूने ही अशी ताटली त्याच्या कपाटात इतकी व्यवस्थित आणि जपून का बरं ठेवली असेल?
संध्याकाळी सोनू शाळेतून घरी येतो. आई त्याला त्याच्या आवडीचा लाडू खायला देते आणि विचारते “अरे सोनू! तू तुझ्या कपाटात ती जर्मनची थाळी का आणि कोणासाठी आणून ठेवली आहेस? कोणाला द्यायची आहे का? का तूच ती वापरणार आहेस? का आणि कधी?
तेव्हा आईच्या त्या प्रश्नाला सोनूने जे उत्तर दिले ते ऐकून ती आश्चर्यचकितच झाली.
कारण तो म्हणाला “आई! मी ती ताटली तुमच्यासाठी आणून ठेवली आहे. आजीसारखे तुम्ही म्हातारे झालात, की मी तुम्हाला याच ताटलीत जेवण वाढीन.’ त्या उत्तराने तिला तिची चूक लक्षात आली. आज आपण जे करतोय ते मुलं पाहात असतात. उद्या त्यांनी आपल्याही बाबतीत तेच केलं तर कोणाला दोष द्यायचा. त्यांना का आपल्या आजच्या कृतीला?