पुणे – घरी परतलेल्यांपैकी मेट्रोचे 50 टक्के कामगार कामावर परतले आहेत. त्यामुळे वनाज ते रामवाडी आणि पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट या दोन मेट्रो मार्गांच्या कामाला पुन्हा वेग येणार आहे.
भुयारी आणि उन्नत मेट्रो मार्गाच्या कामासाठी मेट्रोला 3,400 कुशल आणि अकुशल कामगारांची आवश्यकता आहे. लॉकडाऊनपूर्वी मेट्रोकडे 2,800 कामगार होते. यानंतर लॉकडाऊन शिथिलता आणि रेल्वे व्यवस्थेमुळे 2 हजार कामगार गावी परतले. त्यामुळे मेट्रो कामासाठी अवघे 880 कामगार बाकी होते.
रेल्वे आणि बस सेवा बंद असल्यामुळे महामेट्रोने मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल राज्यांतील जिल्हा प्रशासनांना पत्रे लिहून या मजुरांना परत येण्याची व्यवस्था करण्याची विनंती केली; मात्र त्याला अल्प प्रतिसाद मिळाला. त्यामुळे आता ठेकेदाराने बिहार आणि झारखंड येथे 3 बसेस पाठवून कामगारांना परत आणले, तर बरेचशे कामगार स्वतः परतले. आतापर्यंत 1,700 कामगार कामावर रूजू झाले आहेत, असे महामेट्रोचे महाव्यवस्थापक हेमंत सोनवणे म्हणाले.