पुणे – नागरिकांनी करोनाची खबरदारी घेतली जात असल्याने आता अनेकजण प्रवास टाळू लागले आहेत. त्याचा फटका राज्य मार्ग परिवहन महामंडळाला बसला आहे. परिणामी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) बसेसच्या फेऱ्या निम्म्यावर आणल्या आहेत. पुणे विभागातील 13 आगारांमधून दररोज 5 हजार फेऱ्या होतात. बुधवारी मात्र सुमारे अडीच हजार फेऱ्याच झाल्याची माहिती एसटी प्रशासनाने दिली.
पुणे विभागातून दररोज 1 हजार बसेसमधून दररोज सुमारे 3 लाख प्रवासी विविध ठिकाणी प्रवास करतात. यातून एसटीला सुमारे 1 कोटींचे उत्पन्न मिळते. बुधवारी मात्र प्रवासी संख्या निम्म्यापेक्षा कमी असल्याचे दिसून आले.
तसेच, गेल्या दोन-तीन दिवसांपासून एसटीचे सुमारे 80 लाख रुपयांचे उत्पन्न बुडाल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. दरम्यान, एसटीचे वेळापत्रक बुधवारी सलग दुसऱ्या दिवशीही कोलमडले. अनेक गाड्या रद्द केल्या, तर बहुतांश गाड्या एक ते दीड तास विलंबाने धावत आहेत. प्रवासी संख्या आणखी घटल्यास फेऱ्या अजून कमी करण्यात येतील, असे सूतोवाच महामंडळाकडून देण्यात आले.
स्वारगेट येथून दररोज होणाऱ्या 160 फेऱ्यांपैकी 100 फेऱ्याच झाल्या. 17 मार्च 2019 रोजी 54 टक्के असणारे प्रवासी भारमान यंदाच्या वर्षीच्या 17 मार्च 2020 रोजी अवघ्या 43 टक्क्यांवर पोहोचले आहे. बोरिवली, ठाणे येथे सोडण्यात येणाऱ्या वातानुकूलित शिवनेरीच्या फेऱ्या निम्म्यावर करण्यात आल्या आहेत.
– स्वाती आवळे, आगार व्यवस्थापक, स्वारगेट