खोरोची बंधारा कोरडाठाक
निमसाखर-सध्या वाढत्या तापमानामुळे निमसाखर परिसरातील उभ्या पिकांना पाण्याची गरज भासू लागली आहे. यामुळे खोरोची बंधारा कोरडा पडला आहे. निमसाखर व नीरवांगी भागातील नीरा नदीवरील पाण्याच्या उपशामुळे थोडा फार मृतसाठा शिल्लक राहिल्याने या भागातील शेतकरी अडचणी आला आहे.
सध्या वाढत्या उन्हाच्या चटक्यामुळे सुर्य देवता जणु काही आग ओकत असल्याची प्रचिती येत आहे. यामुळे अंगाची लाही-लाही होत आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक हैराण झाले आहेत. अशा परिस्थितीत इंदापूर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील निमसाखर व निरवांगी परिसरातील उभ्या पिकांना सध्या गरज भासत आहे. सध्या नीरा डाव्या कालव्याला आवर्तन सुरु झाले असले तरी 54 फाट्यासह अन्य फाट्यांना पाणी मिळण्यासाठी आणखी वेळ लागणार आहे.दरम्यान याच काळात खोरोची येथील मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच कोल्हापुरी पद्धतीचा बंधारा कोरडा पडल्याची स्थिती होती.
निरवांगी व निमसाखर येथील कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे एप्रिलच्या सुरुवातीपर्यंत पुरेल एवढा अल्प पाणीसाठा आहे. यानंतर मात्र चिमणीला सुद्धा पाणी प्यायचे झाले तरी पाणी शिल्लक राहणार नसल्याचे नागरीक सांगतात. यामुळे उन्हाळी पिकांनाही पाणी मिळणार नसल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. वीर धरण साखळीत पाण्याचा साठा बऱ्यापैकी असल्याने या भागातील शेतकरी नीरा नदीत पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी या भागातील शेतकरी करत आहे.