कराड (प्रतिनिधी) – वनवासमाची नंतर मलकापूरमध्ये वाढते करोना बाधितांचे प्रमाण नगरपालिकेसाठी डोखेदुखीचा विषय बनला आहे. बाहेर गावाहून आलेल्या प्रवास हिस्ट्रीच्या रूग्णांची संख्या सर्वाधिक आहे. सध्या मलकापूरने करोना बाधितांचे अर्धशतक पूर्ण केले आहे. तर येथील करोना वॉरियर्सच्या प्रयत्नामुळे यापैकी 34 जण करोनामुक्त झाले आहेत. असे असतानाही करोनाचा वाढता प्रार्दुभाव लक्षात घेता मलकापूर वासियांनी काळजी घेण्याची नितांत गरज आहे.
एप्रिल महिन्यात आगाशिवनगरला पहिला करोनाबाधित रुग्ण आढळला. आगाशिवनगर, अहिल्यानगर परिसरात करोना साखळी सुरू झाली. ही साखळी खंडित करण्यासाठी पालिकेने राबवलेल्या विविध उपाय योजना तसेच पोलिसांची कडक भूमिका व शासनाच्या आदेशाचा आदर ठेवत येथील नागरिकांनी लॉकडाऊनचे कडक पालन केले. त्यामुळे शहरातील करोनाचा संसर्ग नियंत्रणात ठेवण्यात पालिकेला यश आले होते.
मलकापूरमधील चार ठिकाणे माक्रो कंन्टेमेंन्ट क्षेत्र म्हणून घोषित केली. यावेळी जनजागृतीसह संपूर्ण पालिका कार्यक्षेत्राचे निरजंतुकीकरण व आरोग्य सर्व्हेवर पालिकेने भर दिला. तर कृष्णा हॉस्पिटलने करोनाची साखळी खंडित करण्यात मोलाचे योगदान दिले. शहरातील सर्व 28 रुग्ण बरे होऊन घरी परतले. मात्र लॉकडाऊन शिथील झाल्यानंतर मुंबईहून आलेले पाच जण पॉझिटिव्ह आले. आणि पुन्हा मलकापूर करोनाच्या विळख्यात सापडले. नवीन रुग्ण सापडलेली ठिकाणे कंन्टेमेंन्टमधे घेण्यात आली. दि. 26 एप्रिलला शहरातील सर्व रुग्ण बरे झाल्याने मलकापूर शहर पुन्हा करोनामुक्त व कन्टेमेन्टमुक्त झाले. दरम्यान, एक महिन्याच्या विश्रांतीनंतर दि. 26 जूनला खंडोबानगरमधे पुन्हा करोनाचा शिरकाव झाला. या रुग्णाच्या संपर्कात आलेल्यासह बाहेरून आलेले असे 15 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. या व्यतिरिक्त वेगवेगळे तीन रुग्ण बाधित सापडले. गुरुवारी रात्री उशिरा आलेल्या अहवालामध्ये मलकापुरातील एक डॉक्टर करोनाबाधित झाल्याचे स्पष्ट झाले आहे. शनिवारी सकाळी यात भर पडली असून नवीन दोन करोनाबाधित आढळले. त्यामुळे मलकापुरातील बाधितांचा आकडा 50 च्या पुढेच गेला आहे.
शहरात कडक उपाययोजनांची गरज
येथील करोना वॉरियर्सच्या प्रयत्नांना दोन वेळ यश आले. मात्र बाहेरहून आलेल्या लोकांचा नाहक त्रास मलकापूरवासियांना होत आहे. यासाठी पालिका व पोलीस प्रशासनाने तातडीने यावर ठोस उपाय योजना करण्याची नितांत गरज आहे. अन्यथा मलकापूरचे करोनापूर होण्यास वेळ लागणार नाही.