पिंपरी, दि. 23 – हळदी कुंकवाला सौभाग्यवतींच्या बरोबर विधवा महिला भगिनींना सन्मान दिला पाहिजे, असे मत पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा सीमा सावळे यांनी व्यक्त केले.विधवा महिलांसाठी हळदीकुंकू हा कार्यक्रम जयगणेश साम्राज्य आणि जिजाई प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आला. यावेळी त्या बोलत होत्या. या वर्षीपासून प्रभागातील हळदी कुंकू समारंभात इतर महिलांच्या बरोबरीने विधवा भगिनींनासुध्दा सन्मान देण्याचा उपक्रम सीमा सावळे यांनी सुरू केला.
सीमा सावळे म्हणाल्या, हिंदू धर्मात पूर्वी सती प्रथा होती, पण राजाराम मोहन रॉय यांनी पुढाकार घेऊन ती बंद केली. महिलांच्या शिक्षणाला धर्माचार्यांचा विरोध असे, पण सावित्रीबाईंनी क्रांति केली म्हणून स्त्री शिक्षणाची कवाडे खुली झाली. तोच आदर्श समोर ठेवून आता संक्रांत सणाच्या हळदी कुंकवाला सौभाग्यवतींच्या बरोबर विधवा महिला भगिनींना सन्मान दिला. आजचे जग खूप बदलते आहे. शिक्षण आणि तंत्रज्ञानामुळे देशात मोठी क्रांती झाल्याने समाजसुध्दा कालबाह्य प्रथा परंपरा सोडून देतो आहे. बदल हा तसा सृष्टीचा नियम आहे आणि जो काळानुरुप आपले आचार विचार बदलतो तोच प्रवाहात, स्पर्धेत टिकतो. सुदैवाने आपला धर्मसुध्दा आता आधुनिक विचारांनुसार परिवर्तनशील झाला आहे. त्यासाठीच संक्रातीचे हळदी कुंकूवाला सौभाग्यवती महिलांच्या बरोबरीने विधवा महिलांना सन्मान देण्याला आम्ही सुरुवात केली आहे.
विजया चौगुले यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. मिनाक्षी हांडे यांनी या उपक्रमात पुढाकार घेतला. ज्योती सोनवले, स्वाती पांचाळ, निलम सोलापुरकर, योगिता विभुते, विशाखा बनसोडे, मनिषा गारुडे, रंजना शेंडे, 20 ते 25 विधवा महिलांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला होता. या कार्यक्रमासाठी निवृत्ती अमुप, संतोष धायवार, गाढवे यांनी सहकार्य केले.