हैदराबाद – आंध्र प्रदेशच्या दक्षिण भागातील चित्तूर, कडप्पा, नेल्लोर आणि अनंतपूर जिल्ह्यात पावासाने हाहाकार माजवला. पावसाच्या पाण्याने आलेल्या पुरामुळे 20 हजार जणांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले असून 15 जण या वादळी पावसात मरण पावले आहेत. तर 18 जण अद्याप बेपत्ता आहेत, असे सरकारने स्पष्ट केले आहे.
अवकाळीग्रस्त भागाचा मुख्यमंत्री वाय. एस. जगमोहन रेड्डी यांनी हवाई पहाणी केली. त्यांनी या संबंधित जिल्ह्याधिकाऱ्यांसह आढावा बैठकही घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रेड्डी यांच्याशी संपर्क साधून सर्वतोपतरी सहकार्याचे आश्वासन दिले.
चित्तूर आणि नेल्लोर जिल्ह्यात गुरुवारपासून सुरू असणाऱ्या मुसळधार पावसाने नदीपात्रे ओसंडून वहात अहेत. स्वर्णमुखी, कालिंगी नद्यांनी धोक्याची पातळी गाठली आहे. 32 हजार हेक्टर शेतजमीन पाण्याखाली आहे. आंध्र प्रदेशचा किनारावर्ती भाग आणि रायलसीमा भागात मुसळधार पर्जन्यवृष्टीचा इशारा शनिवारी देण्यात आला.
राष्ट्रीय आपत्कालीन प्रतिसाद दलाची सात पथके तैनात करण्यात आली आहेत. राज्य आपत्कालीन प्रतिसाद दलाची नऊ पथकेही बचाव कार्यात सहभागी झाली आहेत. कडाप्पा आणि अनंतपूर जिल्ह्यात दोन हेलीकॉप्टरही बचाव कार्यात तैनात करण्यात आली आहेत.
चेय्यूरू गावात पुरात अडकलेल्या बसमधून 35 प्रवाशांची सुटका करण्यात आली आहे. वेलदुरर्थी येथे कालव्याच्या पाण्याने घेरलेल्या दहा व्यक्तींना हेलीकॉप्टरच्या सहाय्याने सुरक्षितस्थळी हलवण्यात आले. कडाप्पा येथे नदीचे पाणी घरात शिरल्यानंतर एका गर्भवती महिलेला सुरक्षितपणे हलवण्यात आले. गांदी येथे तीन व्यक्ती 15 म्हशींची सुटका अग्नीशामक दलाच्या जवानांनी केली.
राज्यात 230 पुनर्वसन शिबिरे असून अन्न आणि पाण्याची पाकिटे तसेच तांदूळ त्यांना देण्यात येत आहे. शिबिरात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला एक हजार रूपये किंवा प्रत्येक कुटुंबाला दोन हजार रुपयांचे अर्थसहाय्य देण्यात येत आहे, अशी माहिती सरकारी सूत्रांनी दिली.