- नागरिकांची उडाली तारांबळ
टाकवे बुद्रुक – गुरुवारी सायंकाळच्या सुमारास आंदर मावळ परिसरात गारांसह पाऊस पडला. अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली.
राज्यात कमी दाबाचा पट्टा निर्माण झालेल्या मध्य महाराष्ट्र व विदर्भ, मराठवाडा या भागांत पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली होती. काल लोणावळा व मावळ परिसरात दाट धुके दाटून आले होते. आज दुपारपासून आकाशात ढग दाटून आले होते. ढगांचा गडगडाट व विजांचा कडकडाट होऊन गारपीट झाली. तर सायंकाळी चारनंतर वातावरणात गारवा येऊन हवा सुटली होती. त्यात साडेपाच वाजताच्या सुमारास अचानक जोरदार पाऊस झाल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. पादचारी व दुचाकीस्वार जागा मिळेल तेथे आडोशाला थांबले होते. टाकवे गावात यात्रेनिमित्त आलेल्या दुकानदारांची चांगलीच तारांबळ उडाली. अवकाळी पावसाचा शेतकरी वर्गाला चांगलाच फटका बसला आहे. शेतामधील मसूर, हरबरा, वाटाणा ही पिके काढण्याचे काम सुरू असताना अचानक पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.