मुंबई – राज्यात राष्ट्रपती राजवट आणण्याची वेळ आली असल्याचे वक्तव्य भाजपा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. जळगाव वसतिगृह प्रकरणावरुन संताप व्यक्त करताना सुधीर मुनगंटीवार यांनी राज्य सरकार काहीच कारवाई करत नसल्याची टीका केली आहे.
सुधीर मुनगंटीवार म्हणाले कि, अध्यक्ष महोदय, उद्या माझी बहीण, तुमची बहीण एक सेकंद नजरेत आणा. तुम्ही जर गृहमंत्री असता तर खून केला असता. अशा पद्धतीने तुमच्या, माझ्या आई बहिणीला नग्न करुन, कपडे काढून नाचायला लावलं जातंय आणि आम्ही नोंद घेवू म्हणतात. इथं मृत मनाचे आमदार आहेत? काय कारवाई करणार हे सांगण्याऐवजी केवळ नोंद घेतो एवढेच सांगितले जात आहे. हे पाप फेडावं लागेल. आमच्या आई-बहिणीला नग्न केलं जातं या महाराष्ट्रात आणि आम्ही नोंद घेतो, असा संताप त्यांनी व्यक्त केला आहे.
पोलीस यंत्रणा माहितीच घेत नसेल तर हे सरकार कशासाठी आहे ? जर आमच्या आई-बहिणीची थट्टा होणार असेल तर राष्ट्रपती राजवट हा एकच मार्ग आहे, असा संताप मुनगंटीवारांनी व्यक्त केला आहे, असेही मुनगंटीवार म्हणाले आहेत.
दरम्यान, यावर नवाब मलिक यांनी राष्ट्रपती राजवट लावण्याची धमकी देऊ नका हे वाक्य रेकॉर्डवरून काढा, अशी मागणी केली.