हैद्राबाद बलात्कार प्रकरणावर तेलंगणाच्या गृहमंत्र्यांचा अजब दावा
हेद्राबाद : तेलंगणाची राजधानी असलेल्या हैदराबाद येथे महिला पशुवैद्यकावर सामूहिक बलात्कार करण्यात आल्यानंतर हत्या आणि नंतर मृतदेह जाळून देण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे. एकीकडे देशभरात या घटनेवरुन संताप व्यक्त होत असताना तेलंगणचे गृहमंत्री मोहम्मद मेहमूद अली यांनी पीडित तरुणीवच खापर फोडले आहे. तरुणी इतकी सुशिक्षित होती तर मग पोलिसांना फोन करण्याऐवजी बहिणीला कशाला केला? अशी विचारणा त्यांनी केली आहे. जर बहिणीला फोन करण्याऐवजी तिने पोलिसांना फोन केला असता तर कदाचित वाचवता आले असता असा दावाही त्यांनी केला आहे.
#WATCH Telangana Home Min on alleged rape&murder case of a woman veterinary doctor: We’re saddened by the incident,crime happens but police is alert&controlling it. Unfortunate that despite being educated she called her sister¬ ‘100’,had she called 100 she could’ve been saved. pic.twitter.com/N17THk4T48
— ANI (@ANI) November 29, 2019
माध्यमांशी बोलताना मोहम्मद मेहमूद अली यांनी ही मुक्ताफळे उधळली आहेत. पीडित तरुणी डॉक्टर असून सुशिक्षित होती. पोलिसांना फोन करण्याऐवजी तिने कुटुंबाला फोन करणे दुर्दैवी आहे. 100 नंबरवर फोन करण्याऐवजी तिने आपल्या बहिणीला फोन केला.
या घटनेचे आम्हाला दुख: आहे. पोलीस अलर्ट असून गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवत आहेत. पीडित तरुणाने 100 नंबरवर फोन न करता बहिणीला फोन करणं दुर्दैवी आहे. 100 नंबरवर फोन केला असता तर कदाचित तिला वाचवता आले असते, असे वक्तव्य मोहम्मद मेहमूद अली यांनी केले आहे. तरुणीने आपल्या बहिणीला फोन करुन आपण घाबरलो असल्याचे सांगितले होते. मी घाबरले आहे. ते सगळे (अनोळखी लोक) बाहेर माझी वाट पाहत आहेत. तू माझ्याशी बोलत राहा, मी घाबरले आहे,असे पीडित तरुणीने फोनवर आपल्या बहिणीला सांगितले होते.