पुणे: विधानसभा निवडणुकीत कापल्यानंतर भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे हे नाराज असल्याचे पाहायला मिळत आहे. तशी नाराजी देखील त्यांनी अनेकदा बोलून दाखवली आहे. मागील काही दिवसांनंतर खडसेंच्या पक्षांतराबद्दलच्या चर्चानी जोर धरला आहे. त्याला करणेही तशीच आहेत. पक्षात आपल्याला वारंवार अपमानास्पद वागणूक मिळत असल्याने वेगळा विचार करावा लागेल असं सूचक विधान खडसेंनी केलं आहे. तसेच त्यांच्यावर झालेल्या अन्यायाबद्दल देखील त्यांनी भाष्य केलं आहे.
जर दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे हे आज हयात असते तर माझ्यासारख्या निष्ठावान कार्यकर्त्यावर अन्याय झाला नसता’ अशा शब्दात खाडिस्नी आपली खंत व्यक्त केली आहे. १२ डिसेंबर रोजी गोपीनाथ मुंडेंच्या जयंती निमित्त पंकजा मुंडेंनी भव्य मेळाव्याचे आयोजन केले आहे. या मेळाव्यासाठी एकनाथ खडसे उपस्थित राहणार आहेत. त्या पार्शवभूमीवर खडसेंनी माध्यमांशी संवाद साधला आहे.
यावेळी बोलताना खडसेंनी गोपीनाथ मुंडेंच्या आठवणींना उजाळा देत आपल्या भावनांना वाट करून दिली. ते पुढे म्हणाले की, गोपीनाथ मुंडे यांच्या जाण्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठी पोकळी निर्माण तर झालीच, शिवाय भाजपमध्येही त्यांच्या जाण्यामुळे कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली. गोपीनाथ मुंडे असते तर… अशा चर्चा देखील आता होत आहेत. ते आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना एक आधार वाटत होते. आज ते असते तर कदाचित भाजप आणि सेनेतील युती कायम राहिली असती. भाजपची आज जी अवस्था आहे, त्यापेक्षा निश्चित चांगली अवस्था राहिली असती, अशी माझ्यासारख्या कार्यकर्त्यांची भावना आहे. सर्वपक्षीय नेत्यांशी त्यांचे चांगले संबंध होते. त्यांची भूमिका सदैव समन्वयाची असायची, असेही खडसेंनी यावेळी सांगितले.