आयटी कंपन्यांतील घरून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सूचना
पुणे – कर्मचारी जेव्हा कार्यालयात काम करतात तेव्हा कार्यालयातील संगणकाच्या सुरक्षिततेची काळजी घेतली जाते. मात्र, करोना व्हायरसमुळे बऱ्याच कर्मचाऱ्यांना घरातून काम करण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. या कर्मचाऱ्यांच्या घरातील यंत्रणा कंपन्यांतील यंत्रणेइतकी सुरक्षित असतेच असे नाही. त्यामुळे अशा कर्मचाऱ्यावर हॅकर्स पाळत ठेवून हल्ले करू शकतात, अशी शक्यता वर्तविली जाऊ शकते. यामुळे करोना व्हायरस संगणक हॅकर्सच्या पथ्यावरच पडला असल्याचे मानले जात असून त्यानुसार सुरक्षित काम करण्याच्या सूचना आयटी कर्मचाऱ्यांना करण्यात आल्या आहेत.
पुण्यासह भारतातील मोठ्या शहरात आयटी कंपन्या एकवटलेल्या आहेत. करोनाच्या संसर्गाच्या परिस्थितीत काम वेळेवर पूर्ण करण्यासाठी या कंपन्या प्रसंगी कर्मचाऱ्यांना वर्क फॉर्म होमची परवानगी देत आहेत, अशाप्रकारे जवळजवळ 20 लाख कर्मचारी लवकरच घरातून काम करू शकतात. मात्र, कंपन्यांची माहिती (डेटा) महत्त्वाची असते. त्यामुळे पुरेशी संगणक सुरक्षितता नसलेल्या कर्मचाऱ्यांच्या संगणकावर हॅकर्सनी हल्ले केले तर त्यामुळे मोठे नुकसान होऊ शकते. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या घरातील संगणक यंत्रणा तेवढीच सुरक्षित करण्याची खबरदारी घेण्याची गरज असल्याचे या क्षेत्रातील तज्ज्ञ सांगतात.
“क्विकहिल’ या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक संजय काटकर यांनी सांगितले की, करोनाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर लगेच हॅकर्सनी आपला मोर्चा त्यानंतर निर्माण होणाऱ्या संधीकडे वळविला असल्याचे दिसून येत आहे. यासंबंधातील स्पॅम मेल भारतासह अनेक देशातील कर्मचाऱ्यांच्या ई-मेलमध्ये आले आहेत. ते म्हणाले की, हल्लेखोर यशस्वी झाले तर कंपन्यांच्या डेटावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी डेटा सुरक्षित राहील, अशा यंत्रणेवरूनच काम करण्याची गरज आहे.
गाफील राहिल्यास गंभीर परिणाम…
संगणकीय आघाडीवर परिस्थिती फारशी आशादायक नाही. याबाबत अवास्ट या संस्थेने केलेल्या या पाहणीत असे आढळून आले की, जवळजवळ 40 टक्के कर्मचारी आणि कंपन्यांनी कर्मचाऱ्यांच्या घरातील यंत्रणेच्या सुरक्षिततेबाबत काळजी घेतलेली नाही. कंपनी आणि कर्मचारी गाफील राहिले तर त्यासाठी मोठी किंमत मोजावी लागू शकते. त्यामुळे कर्मचारी कोणत्या यंत्रणेवर काम करतो याची माहिती घेऊन ती यंत्रणा सुरक्षा विभागाने मंजुरी दिल्यानंतरच वापरण्याची गरज आहे. त्याचबरोबर हॅकर्सचे लक्ष फक्त मोठ्या कंपन्याच असते असे नाही. छोट्या कंपन्यावरही हॅकर्स पाळत ठेवून असू शकतात. याबाबत सर्वांनी सावध राहण्याची गरज आहे. अन्यथा याचा गैरफायदा घेऊन हॅकर्स कंपन्यांच्या व्यवस्थेला आजारी पडू शकतात.