ह.भ.प. पंडित महाराज क्षीरसागर यांचे विठ्ठलभाव अनुभवण्याचे आवाहन
– ज्ञानेश्वर फड
आळंदी – विठ्ठल जळी स्थळी भरला।
रिता ठाव नाही उरला ।।
आजी म्या दृष्टीने पाहिला ।
विठ्ठलची विठ्ठल ।।
असे संतश्रेष्ठ जगद्गुरू तुकोबारायांनी सांगितले आहे. त्यामुळे विठ्ठल हा प्रत्येक ठिकाणी आहे. विठ्ठल नाही असे कोणतेही ठिकाण नाही. मग करोनाचे संकट पसरवायला अलंकापुरी किंवा भूवैकुंठ पंढरीला येण्याचा अट्टहास कशासाठी? यंदाचा कार्तिकी वारी सोहळा आपल्याच गावात सुरक्षेचे सर्व निकष पाळत कीर्तन, प्रवचन करत विठुनामाच्या भक्तीत तल्लीन व्हावे, असे कीर्तनकार ह.भ.प. पंडित महाराज क्षीरसागर यांनी सांगितले.
दै. प्रभातने कुंभार गुरुजी वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष असणाऱ्या क्षीरसागर महाराज यांच्याशी वारीवर घोंघावणाऱ्या करोनाचे संकटांवर संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, 26 नोव्हेंबरला पंढरपूरची कार्तिकी वारी आहे. या वारीसाठी दरवर्षी राज्यभरातून लाखो भाविक पंढरीत दाखल होतात. मात्र, यंदा करोनाच्या महासंकटामुळे पंढरीत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. वारकऱ्यांना वारीसाठी पंढरपूरला येता येणार नाही. मात्र पंढरपूरला गेलं तरच वारी होते असं काही नाही, काही संत त्या काळातसुद्धा प्रत्येक महिन्याच्या किंवा विठ्ठल जळी-स्थळी भरला…!
वर्षाच्या वारीला पंढरपूरला जातच होते असे नाही. त्यांना ईश्वराच्या सर्व व्यापकतेचा बोध परिपूर्णतेनं प्राप्त झाला होता. त्यामुळे देवच त्यांच्यात आहे, मीच देव आहे. तुका म्हणे हा तो स्वये परब्रम्हें अशा प्रकारची समजूत त्यांची होती. देव मीच आहे, अशी प्रेरणा संतांनी सामान्य माणसांनाही दिलेली आहे. त्यामुळे समाजाच्या आरोग्याचा विचार करणे आवश्यक असून गावच्या विठ्ठल मंदिरात जाऊन देवाचे दर्शन घ्यावे कीर्तन, प्रवचन करावे. काया ही पंढरी । आत्मा हा पांडुरंग ।। ही मूळ भूमिका आता आचरणात आणण्याची संधी या कोरोनामुळे आपल्याला उपलब्ध झालेली आहे.
आपल्या गावालासुद्धा आळंदी, पंढरपूर करण्याची संधी कोरोनामुळे मिळालेली आहे, असे ते म्हणाले. ही वारी प्रत्येकाने आपापल्या गावात करायची ठरवली आहे. जगद्गुरू तुकोबारायांचा वैकुंठगमन सोहळा जसा दरवर्षी गावात साजरा करत होतो. त्याप्रमाणेच यंदाची वारी देखील आपल्या गावात साजरी करण्याचे ठरवले असल्याचे अनेकांनी मला फोन करून कळवले आहे, असेही ते म्हणाले.
शासननिर्णय योग्य
वारकरी जगला तर वारी करता येईल. वारीसाठी जर हजारो वारकरी पंढरीत दाखल झाले तर एकापासून दुसऱ्याला करोनाची बाधा होण्याची शक्यता असते. त्यामुळे शासनाने पंढरपूरमध्ये लावलेली संचारबंदी योग्य आहे. शासनाच्या आदेशाचे पालन केले पाहिजे. सरकारने वारकऱ्यांच्या, भाविकांच्या जीवाचा विचार करूनच हे पाऊल उचलले आहे. त्यामुळे वारकऱ्यांनी शासनाच्या निर्णयाला विरोध करू नये, असे आवाहनही त्यांनी केले.
वारकरी संप्रदायाचं उपासनेचं साधन म्हणजे भजन आहे आणि देवाच्या गुणवर्णनाकरिता कीर्तन आहे. त्यामुळे देवाचं आणि संताचं भजन करावं, कीर्तन, प्रवचन करावं, नामस्मरण करावं. मात्र हे सर्व करत असताना शासनाने घालून दिलेल्या नियमांचं पालन करून हे कार्यक्रम करावेत. जसे की मास्कचा, सॅनिटायझरचा वापर टाळकऱ्यांमध्ये योग्य अंतर ठेवावे.
– ह.भ.प. पंडित महाराज क्षीरसागर अध्यक्ष, कुंभार गुरुजी वारकरी शिक्षण संस्था