देवाचिये द्वारीं उभा क्षणभरी । तेणें मुक्ति चारी साधियेल्या ।। हरि मुखें म्हणा हरि मुखें म्हणा । पुण्याची गणना कोण करी ।। संत ज्ञानेश्वर महाराज हरिपाठातील पहिल्या अभंगात म्हणतात, देवाच्या द्वारी क्षणभर उभे राहिल्याने सलोकतादि चारी मुक्तीचा लाभ होतो.
हे असंभाव्य वाटते, परंतु द्वारी उभे असणे म्हणजे सेवकाच्या नात्याने तत्पर असणे असा अर्थ घेतला पाहिजे. श्रीतुकोबारायांनी सेवा ते आवडी उच्चारावें नाम । भेदाभेद काम सांडोनिया ।। परमप्रितीने भगवन्नामोच्चार करणे हीच हरीची सेवा आहे असे सांगितलें आहे.
श्रीज्ञानेश्वर महाराजांनीही पुढील ध्रुवपदांत हरि मुखें म्हणा हरि मुखें म्हणा असें द्विरुक्तीनें सांगण्यात हरीचे नामस्मरण हेच देवाचे द्वार असे सुचविले आहे. क्षणभर या पदाचा अर्थ अति अल्पकाल असा घ्यावा. अत्यल्पकाल देखील हरिनामोच्चारणरूप सेवा केली असता चारी मुक्तीचा लाभ होतो, असा पहिल्या कडव्याचा सरळ अर्थ आहे.