कीं भूस बीज एकवट । उपणितां राहे घनवट । तेथ उडे तें फलकट । जाणों आलें ।। 130 ।। तैसें विचारितां निरसलें । तें प्रपंचु सहजें सांडवलें । मग तत्त्वता तत्त्व उरलें । ज्ञानियांसि ।। 131 ।।
संत ज्ञानेश्वर महाराज श्री ज्ञानेश्वरीतील दुसऱ्या अध्यायात म्हणतात, कोंडायुक्त बीज(धान्य) वाऱ्यावर धरून उफणले असता सारयुक्त असलेले वजनदार धान्य खाली उरते आणि पोकळ असलेले असार फोलकट वाऱ्याबरोबर उडून जाते.
असे दोघांचे स्वरूप कळून येते. त्याप्रमाणे सार असार असा विचार केला असता मिथ्या असत्य असणारा प्रपंच ज्ञानी व्यक्तीकडून सहज त्यागला जातो. मग त्या ज्ञानवंताला अशा तत्त्वपूर्ण ब्रह्म सत्याची निश्चित प्राप्ती होते.
म्हणून अनित्य असार वस्तूच्या ठिकाणी ज्ञानवंत सत्यताबुद्धी न ठेवता विचारांती शेष चैतन्याचा स्वीकार करतात. जीवनात सार-असार किंवा सत्य-असत्य यापैकी एकाची निवड करण्याची वेळ अनेकदा येते त्यावेळी सद्सद्विवेकबुद्धी जागृत ठेवून निर्णय घेणे कधीही योग्य असते.